पिंपरी : प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या जोरदार प्रचार यंत्रणेसमोर आम आदमी पक्षाचे मारुती भापकर यांचा प्रचार फिका ठरला. भौगोलिक दृष्टा विस्तारलेल्या मावळ मतदार संघात सर्व मतदारांपर्यत पोहोचण्यात ते अपयशी ठरले. तसेच, दिल्ली विधानसभेच्या गोंधळामुळे डागाळलेल्या प्रतिमेमुळे पक्षाची जादू चालली नाही. परिणामी भापकर यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मावळात बलाढ्य समजल्या जाणार्या महायुतीचे श्रीरंग बारणे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप, राष्टÑवादीचे राहुल नार्वेकर तसेच, बहुजन समाज पक्षाचे टेक्सास गायकवाड यांचे आव्हान होते. या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांच्या प्रचारासमोर भापकरांचा प्रचार खूपच मर्यादित होता. दिल्ली विधानसभेनंतर महाराष्ट्रातील ही पहिलीच निवडणूक होती. दिल्लीच्या विधानसभा गोंधळामुळे आपचे आकर्षण कमी झाले होते. अल्प काळात पक्षबांधणी न झाल्याची कमतरता त्यांना भासली. बोटावर मोजता येथील इतके कार्यकर्ते घेऊन त्यांना प्रचार यंत्रणा राबवावी लागली. त्यांचा भर पदयात्रा व रॅलीवर अधिक होता. आकारमानाने मावळचे क्षेत्र खूपच मोठे असल्याने सर्व भागांत भापकर पोहोचू शकले नाहीत. आपचा भ्रष्टाचाराचा मुद्दा मतदारांना भावला नाही. प्रचाराची सर्व धुरा सर्वस्वी भापकरांवर अवलंबून होती. सर्वसामान्यांच्या विविध जनआंदोलनात त्याचा सक्रिय सहभाग आहे. कामगार, शेतकरी वर्गात त्यांचा दांडगा संपर्क आहे. याच कार्याच्या बळावर ते रिंगणात उतरले होते. मात्र, त्याच्या ‘एकला चलो रे’ नीतीचा प्रभाव मतदारांवर फारसा पडला नाही. सर्वसामान्य वर्गातील असल्याने त्यांना आर्थिक गणिते सोडविता आली नाहीत. त्यामुळे खर्चाची मर्यादा होती. सुशिक्षित मतदार आपकडे वळेल असे म्हटले जात होते.(प्रतिनिधी)
मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयशी
By admin | Updated: May 19, 2014 01:52 IST