पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. सर्व कृषी विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांना बीएस्सी अॅग्री (ऑनर्स) या पदवी अभ्यासक्रमाच्या समकक्षतेचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. मात्र, या पदवी अभ्यासक्रमाच्या नावांमध्ये बदल झाल्याने, कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षा, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या परीक्षा देण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध करून हा प्रश्न मार्गी लावला आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे कृषी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या पदवी अभ्यासक्रमांच्या नावामध्ये बदल करण्यात आले. परंतु, या बदलामुळे कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांना विविध परीक्षा देताना अडचणी येत होत्या. त्यामुळे कृषी परिषदेच्या बैठकीत कृषी अभ्यासक्रमांच्या पदव्यांना बीएससी अॅग्री अभ्यासक्रमाच्या पदवीची समकक्षता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कृषी शाखेच्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उच्च शिक्षणातील अडथळा दूर
पदवी अभ्यासक्रमांमध्ये बीएससी उद्यानविद्या, बीएससी वनविद्या, बीएससी सामाजिक विज्ञान, बीएफएससी ( मत्स्य विज्ञान), बीटेक (कृषी अभियांत्रिकी), बीटेक (अन्नतंत्रज्ञान), बीटेक (जैवतंत्रज्ञान), बीएससी (एबीएम)/ बीबीएम (कृषी)/ बीबीए (कृषी), बीएससी कृषी व्यवसाय व्यवस्थापन यांचा समावेश आहे. आता कृषी शाखेत विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी आणि विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अडचण येणार नाहीत.