पिंपरी : सततच्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांनी पीएमपीकडे पाठ फिरविली आहे. गेल्या वर्षभरात बसची संख्या वाढूनही त्या तुलनेत प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे घटती प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रवासी सेवा सुधारण्यावर प्रशासनाने भर देणे गरजचे आहे, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाने केली आहे. पीएमपीच्या ताफ्यात १६२० बसेस असताना २०१० मध्ये रोज प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या १२ लाख ८१ हजार होती. मात्र मार्च २०१४ मध्ये पीएमपीच्या ताफ्यात २०५३ बसेस असताना प्रवासी संख्या १० लाख ६८ हजारावर आली आहे. वाढलेल्या बसच्या तुलनेत प्रवासी संख्या २३ लाख ४५ हजारापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बसची प्रवासी संख्या वाढण्याऐवजी घटतच चालली आहे. प्रत्येक वेळी संचालक मंडळाने डिझेल वाढ, स्पेअर पार्ट, सीएनजी आदीच्या दरवाढीचे कारण पुढे करीत तिकीटात वाढ केली आहे. मात्र सद्यस्थितीत स्पेअरपार्ट खरेदीअभावी सुमारे ४०० ते ५०० बसेस बंद आहेत. त्यामुळे याआधी मिळालेला पैसा कोठे गेला. त्या पैशाचे काय केले, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. (प्रतिनिधी)
ढिसाळ नियोजनाने घटले प्रवासी
By admin | Updated: May 23, 2014 04:56 IST