पुणे : गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणं १00 टक्के भरली होती. त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा कमी बसल्या. मात्र ७ जूनला येणारा पाऊस अद्यपही न पडल्याने जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याची मागणी वाढून आता धरणंही रिकामी झाली आहेत. काही धरणांत फक्त गाळ उरला आहे. गावागावांतील पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. आठवडाभरात पावसाचे आगमन झाले नाही तर तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात ६ टक्के, नीरा देवघर धरणात फक्त १.६0 टक्के व वीर धरणात ६.६३ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यात निम्मा गाळ आहे. यामुळे दोन्ही धरणांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ३५ नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. तालुक्यात २ महिने ७ टँकर व तीन पिकअपद्वारे १३ गावे, ३३ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस झाला नाही तर टँकरची संख्या वाढणार आहे. नीरा देवघर व भाटघर धरण भागातील १३ गावे, ३३ वाड्यावस्त्यांना ७ टँकर व तीन पिकअप जीपमधून दररोज पाणीपुरवठा सुरू आहे. (प्रतिनिधी)
धरणं रिकामी झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात टंचाई
By admin | Updated: June 13, 2014 05:01 IST