मेडद : कटफळ (ता. बारामती) येथील रेल्वेस्थानक प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेले आहे. प्रवाशांच्या दृष्टीने हे रेल्वेस्थानक अत्यंत महत्त्वाचे आहे. स्थानकावर पाणीटंचाई, सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य, बंद पडलेला हातपंप, कमी उंचीचे प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मवर पडलेला राडारोड अशा अनेक मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे.
या स्थानकापासून हाकेच्या अंतरावर बारामती एमआयडीसी असल्याने येथील कामगारांची रोज ये-जा असते. त्यामुळे कायमच कटफळ रेल्वेस्थानकावर वर्दळ असते. त्यामुळे हे स्थानक अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने गाडीतच चढताना आणि उतरताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. प्लॅटफॉर्मवर ठिकठिकाणी खडी आणि माती पडल्याने प्रवाशांना उभेही राहता येत नसल्याची तक्रार प्रवाशांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तेव्हा रेल्वे प्रशासनाने या स्थानकाकडे लक्ष देऊन प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांनी
केली आहे. (वार्ताहर)
सर्वत्र घाणीचे साम्राज्य
या परिसरात असणारा एकमेव हातपंप बंद आहे. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी नियमितपणो साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानकावर स्वच्छतागृह नसल्याने महिला प्रवाशांचे हाल होत आहेत.
टवाळखोर मद्यपींची मैफल
या स्थानकावर रात्री वीज आणि सुरक्षारक्षक नसल्याने स्थानकात टवाळखोर मद्यपींची मैफल जमते. अनेक वेळा या टवाळखोरांकडून प्रवाशांची लूटही झाली आहे. तसेच महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.