पिंपरी : भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक आणि दोन दिवसाचे अधिवेशन पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केले होते़ त्यानिमित्ताने मुख्यमंत्री तसेच भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, मंत्री शहरात दाखल झाले आहेत. विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्याची ही संधी असल्याने विविध संघटनांनी आंदोलन केले. त्याचबरोबर काहींनी मुख्यमंत्र्यांना निवेदने दिली. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शासनाने दारूबंदीची कडक अंमलबजावणी करावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क मद्याची बाटली व्यासपीठाच्या दिशेने भिरकावली. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत डाळ आणि कांदेही फेकले. त्यांची आक्रमकता लक्षात घेऊन पोलिसांनी लगेच देसाई यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनाअटक केली.पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. सकाळी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक़्रमाची तयारी सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर देसाई आणि त्यांचे कार्यकर्ते जमा झाले होते. तृप्ती देसाई याठिकाणी आंदोलन करणार आहेत, याबाबत कोणालाही कुणकुण नव्हती. शहरभर कडक बंदोबस्त ठेवलेले पोलीसही याबाबत अनभिज्ञ होते. मुख्यमंत्र्याचे भाषण सुरू होण्यापूर्वी भूमाता ब्रिगेडच्या देसाई यांनी शासनाचा निषेध नोंदवून दारूबंदीबाबत शासनाने कठोर धोरण अवलंबवावे, अशी मागणी करीत मद्याची बाटली फेकली. (प्रतिनिधी)
डाळ, कांदा फेकून आंदोलन
By admin | Updated: April 28, 2017 05:59 IST