पिंपरी : वातावरणातील बदलामुळे शहरात थंडीची लाट आली आहे. अचानक झालेल्या हवामान बदलामुळे रविवारी शहर गारठले आहे. सुटीचा दिवस असतानाही थंडीमुळे बाजारपेठांवरही परिणाम झाला होता. नेहमीच्या गर्दीची पिंपरी बाजारपेठ आणि उद्यानेही ओस पडली होती.मागील आठवड्यातील शुक्रवारपासून हवामानात बदल होत आहे. कधी उकाडा, कधी हलका पाऊस, तर कधी थंडी असा तीनही ऋतूंचा अनुभव येत आहे. गुरुवारी-शुक्रवारी हवामानात उकाडा जाणवत होता. कमाल तापमान ३८ अंश सेल्सियस नोंदविले गेले. शुक्रवारी हवामानात कमालीचा उकाडा जाणवत होता. तर शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सूर्यनारायणाचे दर्शन झालेच नाही. सकाळपासून सुरू झालेल्या हलक्या सरी दिवसभर अधूनमधून पडत होत्या. सायंकाळी आठच्या सुमारास पावसाची जोरदार सर आली. तसेच वातावरणात काही प्रमाणात उकाडा जाणवत होता. रविवारी मध्यरात्रीपासून हवामानात बदल झाला आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दिवसात फक्त एकदा सूर्यदर्शन दुपारी दोनच्या सुमारास झाले.(प्रतिनिधी)
थंडीची लाट, उद्योगनगरी गारठली
By admin | Updated: October 27, 2014 03:33 IST