दौंड : दौंड शहरात वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून, या वाहतुकीच्या कोंडीवर ठोस उपाय काढले पाहिजे, असे नागरिकांतून बोलले जात आहे. याकामी पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी पुढे आली आहे. शहरातील रस्ते मुळात अरुंद स्वरूपात आहेत. त्यातच काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण त्यांच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या याचबरोबरीने शहरातील काही रोडरोमिओ वेगाने पळवीत असलेल्या दुचाकी गाड्या यामुळे वाहतुकीत विस्कळीतपणा येऊन मुख्य रस्त्यासह गल्लीबोळात वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्यावर पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, धावपळीच्या वेळेत वाहतुकीच्या कोंडीतून नागरिकांना ये-जा करावी लागते. तसेच, शहरात मोठमोठी वाहने वाहतुकीच्या कोंडीत अडकतात. मात्र, रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना दम निघत नसल्याने तेदेखील वाहनांच्या आजूबाजूने दुचाकी काढण्यास स्पर्धा करीत असतात. एकंदरीतच सिंधी मंगल कार्यालय ते महात्मा फुले चौक, रेल्वे कुरकुंभ मोरी ते शिवाजी चौक, जुनी नगर परिषद ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, तसेच स्टेट बँक या परिसरात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. नुकत्याच शाळासुरू झाल्या असून, या वाहतुकीच्या कोंडीचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसतो. तेव्हा वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाय केले पाहिजेत, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना झाली आहे. (वार्ताहर)
दौंड शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त
By admin | Updated: June 17, 2014 02:59 IST