डिंभे : गणपतीच्या सुट्टीनंतर आहुपे आश्रमशाळेतील स्वयंपाकी पुन्हा हजर न झाल्याने विद्यार्थ्यांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी त्यांना मदतीचा हात देत स्वयंपाक करण्यापासून जेवण वाढण्याचे काम ते करीत आहेत.या गैरहजर कर्मचाऱ्यांना शाळा समितीच्या परवानगीशिवाय हजर करून घेऊ नये, अशी मागणी शाळा समितीचे अध्यक्ष रमेश लोहकरे यांनी केली आहे.आंबेगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागात असणाऱ्या आहुपे आश्रमशाळेत सध्या २३० आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या या आश्रमशाळेत शिक्षकांबरोबरच अधिक्षक, स्त्री अधीक्षक, स्वयंपाकी व त्यांना मदत करण्यासाठी कामाठी व सफाईगार अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. परंतु, सध्या या शाळेवर नेमणुकीस असणारे काही कामाठी व स्वयंपाकी गणपतीच्या सुट्टीनंतर अद्याप कामावर हजर झाले नाहीत. यामुळे आहुपे आश्रमशाळेतील आदिवासी मुलांच्या जेवणाखाण्याची हेळसांड होत आहे.गणपती सुट्टीनंतर १ सप्टेंबरला पुन्हा शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी शाळेत रुजू झाले आहेत. मात्र, या मुलांना जेऊ खावू घालावयाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यापैकी १ स्वयंपाकी, ३ कामाठी व १ सफाई कामगार सुट्टी संपून दहा दिवस उलटले तरी शाळेवर हजर झाले नााहीत. उपस्थित आसणाऱ्या अवघ्या दोन-चार कर्मचाऱ्यांना पाणी भरणे, स्वयंपाक करणे, शाळेची सफाई करणे इत्यादी कामे करावी लागत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना जेवण वेळेत मिळत नसून, या शाळेत शिकणाऱ्या २३० आदिवासी विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शाळेच्या वेळेपर्यंत विद्यार्थ्याचा स्वयंपाक बनविणे, जेवण वाढणे, पाणी भरणे या कामासाठी सध्या ग्रामस्थ शाळेस मदत करत असल्याची माहिती शाळा समितीचे अध्यक्ष रमेश लोहकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. शाळा समिती सदस्य विजय असवले, किसन असवले, सोमनाथ वडेकर, किसन भालिंगे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होनाजी वडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)
ग्रामस्थांमुळे टळली आहुपे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची उपासमार!
By admin | Updated: September 12, 2014 03:25 IST