लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कोरोनाबाधितांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यापूर्वी उपचारावर खर्च केलेले पैसे परत मिळविण्याचा हक्क रुग्णाच्या हक्क रुग्णाच्या नातेवाइकांना असणार आहे. त्यासाठी जिल्हा पातळीवर नियंत्रण समिती नेमण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगर अध्यक्ष विजय सागर यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कोरोनाबाधितांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार व्हावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल झाली होती. न्यायालयाने याचिका मान्य करीत महात्मा फुले योजनेअंतर्गत कोरोनाबाधितांवर उपचार करण्याचा आदेश दिला. तसेच एखाद्या रुग्णालयाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीस लाभ नाकारला असल्यास त्याचे पैसे परत देण्याचे आदेशात म्हटले होते. रुग्णालयाचे बिल आणि महात्मा फुले योजनेस पात्र असल्याची कागदपत्रे सादर केल्यास खर्च केलेले पैसे परत मिळवता येतील.