शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेची यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कामाला लागली होती. सर्वेक्षणाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले होते. त्याकरिता मनुष्यबळाची आवश्यकता होती. पालिकेने एकूण साडेतीन हजार कर्मचा-यांची सर्वेक्षणासह कोविड सेंटर आणि विविध कामांकरिता नियुक्ती केली होती. या मनुष्यबळाचा या काळात मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला.
गेल्या एक महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाले आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने काही कोविड सेंटर बंद करण्यात आली. तर सर्वेक्षणाचे कामही कमी केले आहे. त्यामुळे पालिकेच्या विविध विभागांकडून घेण्यात आलेले मनुष्यबळ पुन्हा त्या त्या विभागांना परत पाठविले आहे. यासोबतच दुसरीकडे पीएमपीची सेवा सुरु केली आहे. त्यामुळे पीएमपीएमएलला मनुष्यबळाची आवश्यकता भासते आहे. बस सेवा १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यात येणार असल्याने मनुष्यबळ परत देण्याची मागणी पीएमपीने पालिकेकडे केली होती. पालिकेने त्याला प्रतिसाद देत ६०० कर्मचारी पुन्हा पीएमपी सेवेत पाठविण्यात आले आहे.