पुणे : शहरातील एकूण मतदारसंख्या आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेले नियोजन पाहता, आयोगानेच केवळ ६० टक्के मतदान होईल असे गृहीत धरले असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे १०० टक्के मतदान व्हावे यासाठी जनजागृती अभियान विविध पातळ्यांवर राबविले जात असताना प्रत्यक्षात त्याबाबतचे नियोजनच करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीत एका मतदाराला ४ मते द्यायची आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदाराला सव्वा मिनिटाचा वेळ लागणार असल्याचे विविध महापालिकांकडून घेण्यात आलेल्या डेमोमध्ये दिसून आले आहे. एका मतदान केंद्रांवर सरासरी ७५० ते ८०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ अशी ठेवण्यात आली आहे. मतदानाचा दहा तासांच्या कालावधीमध्ये प्रत्यक्षात ४५० ते ५०० मतदारच मतदान करू शकणार आहेत. त्यामुळे आयोगाच्या नियोजनानुसार निर्धारित वेळेत केवळ ६० टक्के इतकेच मतदान होऊ शकेल असे नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने निवडणुकीची मतदान केंद्रे वाढविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी लोकायत व सोशालिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असताना आयोगाची यंत्रणा सक्षम असल्याचे दिसून येत नाही. चार सदस्यीय मतदान पद्धतीचा यंदा पहिल्यांदाच अवलंब होत असतानाही त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची दखल घेण्यात आलेली नाही. मतदानासाठी प्रत्यक्षात जास्त वेळ लागणार असताना त्यानुसार नियोजन करण्यात आलेले नाही. महापालिकेच्या निवडणुकीसाठी साडेतीन हजार मतदान केंद्रांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी लागणारी पुरेशी मतदान यंत्रेही उपलब्ध नाहीत, त्यामुळे एकाच प्रभागातील दोन गटांसाठी एकच मतदान यंत्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
६०% मतदानाचेच नियोजन
By admin | Updated: February 14, 2017 02:22 IST