एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग विभागातर्फे वाहन अपघात सुरक्षितता आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भारतातील रस्त्यांवर दर वर्षी पाच लाख अपघात होतात आणि त्यात दीड लाख लोकांचे मृत्यू होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी असून, लोकांच्या सहकार्यातून अपघातामुळे होणाऱ्या हजारो लोकांचे प्राण वाचवणे शक्य आहे. २०२५ पर्यंत ५० टक्के रस्ते अपघात आणि मृत्यू कमी करणे आणी २०३० पर्यंत शून्य टक्के रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्याचे आमचे लक्ष असल्याचे गडकरी यांनी सांगितले. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, हरियाणा येथील आयसीएटीचे संचालक दिनेश त्यागी, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एसएई इंडियाचे रश्मी ऊरधवरशे, एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, एमआयटी एडीटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल डॉ. किशोर रवांदे, डॉ. सुदर्शन सानप आदी उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले की, महामार्गावरील, राज्यातील आणि जिल्ह्यातील अपघातस्थळे शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघातांची कारणे, जबाबदार कोण आणि समस्या शोधणे आवश्यक आहे. अपघातस्थळे शोधण्यासाठी महामार्ग मंत्रालय अधिक प्रयत्नशील आणि गंभीरही आहे. तामिळनाडू राज्याने ५३ टक्के रस्ते अपघात आणि मृत्यू दर कमी केले आहे. सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था व कॉर्पोरेट्समध्ये रस्ते सुरक्षेबाबत शिक्षण आणि जनजागृती करणे गरजेचे आहे. वाहन आभियांत्रिकीच्या माध्यमातून सुरक्षित वाहन निर्माण करण्याचे धैर्य आहे. वाहनांची क्रॅश टेस्ट, एअर बॅग्स्, ॲटी लॉक सिस्टिम यांसारखे अनेक फिचर्स असणारे वाहन निर्मिती आमचा प्रयत्न आहे. प्रदूषणमुक्त भारतासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा आणि पेट्रोल आणि डिझेलला पर्याय इंधनावरील वाहननिर्मितीला प्रथम प्राधान्य आहे. भारताला सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणार देश बनविण्याबरोबरच एसी ट्रक, रोड जंक्शन, ट्रॅफिक कमी करणे, लेन शिस्त पाळण्यावरती आमचा विशेष भर असणार आहे. पुणे विभागातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी एक लाख करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे. असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, मंत्री नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी विधायक मोठे कार्य केले. देशातील रस्त्यांविषयक अनेक समस्यांचे निराकारण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशाची लोकसंख्या वाढत असून वाहनांची संख्याही वाढत आहे. परिणामी पार्किंग, ट्रॅफिक, अपघात आणि प्रदूषण वाढत आहे. नितीन गडकरी यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून देशात सुरक्षित रस्ते आणि अपघातशून्य मार्ग बनविण्याचे काम केले जात आहेत.
दरम्यान, आयसीएटीचे संचालक दिनेश त्यागी, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एसएई इंडियाचे रश्मी ऊरधवरशे यांनी विचार व्यक्त केले. डॉ. किशोर रवांदे यांनी प्रस्तावना केली. प्रा. स्वप्निल सिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जयश्री फडणवीस यांनी आभार व्यक्त केले.