शिवप्रसाद डांगे , रहाटणी येथील शिवाजी चौकातील पक्क्या भिंती व पत्र्याच्या खोलीतील असलेल्या जुन्या तलाठी कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. पाडव्याला नवीन वास्तू तयारही झाली असली, तरी अद्याप या ठिकाणी हे कार्यालय हलविण्यात आले नाही. सध्या ज्या ठिकाणी हे कार्यालय आहे त्या ठिकाणी नागरिकांना उभे राहण्यासही जागा नाही, तर रेकॉर्ड ठेवण्यासही जागा नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नवीन कार्यालयासाठी कोणता मुहूर्त लागणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.कार्यालय स्थलांतरित होत नसल्याने येथील पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गखोल्याविना मिळेल त्या ठिकाणी बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. या कार्यालयात रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या तीन गावांचा कारभार चालतो. या तीन गावांसाठी एकच तलाठी कामकाज पाहतात. त्यांच्या हाताखाली एक कोतवाल आहे. मात्र तलाठी भाऊसाहेब नसले, तरी येथील काम थांबत नाही. हे कामगार सरकारी नसले, तरी सरकारी दप्तर यांच्याच हाती असते. कोणाचे काम किती वेळात करायचे ते हीच मंडळी ठरवितात. त्यामुळे अनेक कामासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. सध्या या कार्यालयात जुने दस्तावेज ठेवण्यात आले आहे.
तलाठी कार्यालय स्थलांतर कधी?
By admin | Updated: August 6, 2015 03:32 IST