किवळे : निरपेक्ष भक्ती म्हणजे भोळी भक्ती. संत तुकोबारायांनी भोळी भक्ती केली. निर्विकार भक्ती केली. त्यांच्या भक्तीत अहंकार नव्हता. प्रेमाने परमात्म्याची भक्ती केली. निष्ठेशिवाय व प्रेमाशिवाय केलेली भक्ती व्यर्थ आहे, असे प्रतिपादन कीर्तनकार हभप नानामहाराज तावरे यांनी केले. महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान, अखंड हरिनाम सप्ताह समिती व घोरवडेश्वर प्रासादिक दिंडी यांच्या विद्यमाने श्रीक्षेत्र घोरवडेश्वर पायथा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनसेवा करताना तावरेमहाराज बोलत होते. किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य रघुवीर शेलार, भिवाजी राक्षे, हभप महादेव भसे, हभप सुदाम येवले, हभप निर्गुण बोडके, पोपट भेगडे, खंडू राक्षे, तसेच पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. कीर्तनाला गायनसाथ हभप नितीनमहाराज काकडे, हभप गणेशमहाराज मोहिते, हभप रामेश्वरमहाराज, हभप राजाराम मुऱ्हे, हभप संजय बोडके यांनी केली. मृदंगसाथ हभप मयूर बोडके, मयूर घोडेकर व स्वप्निल सूर्यवंशी यांनी केली. तावरेमहाराजांचा सन्मान वारकरी महामंडळाचे संपर्कप्रमुख हभप जालिंदरमहाराज काळोखे यांच्या हस्ते करण्यात आला. शांताराम भोते यांनी सूत्रसंचालन केले. पहाटे चार ते सहा काकडारती, त्यानंतर सकाळी गाथा पारायण झाले. रावेत जय गणेश भजनी मंडळ व विकासनगर येथील त्रिमूर्ती महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले. सायंकाळी हरिपाठ झाल्यानंतर रात्री नऊला कीर्तनसेवा झाली. कीर्तनानंतर शिवशंभो एकतारी भजनी मंडळाने हरिजागर केला. या वेळी परिसरातील बहुसंख्य भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.(वार्ताहर)
निष्ठा, प्रेमाशिवाय भक्ती व्यर्थ
By admin | Updated: March 5, 2016 00:34 IST