पिंपरी : प्रभाग क्रमांक १९ मध्ये असुरक्षितता जाणवत असल्याने नागरिक भयमुक्त आणि सुरक्षित प्रभागाची अपेक्षा करीत आहेत. पिंपरी कॅम्प, भाजी मंडई, भाटनगर, आनंदनगर, उद्योगनगर मिळून हा प्रभाग बनलेला आहे. प्रभागातील बऱ्याच समस्यांचे निरसन अजूनही प्रशासनाकडून झालेले नाही. खराब रस्ते किंवा पाणी समस्या या समस्या येथे आहेतच. संपूर्ण प्रभागात भेडसावणारी समस्या म्हणजे येथील असुरक्षितता ही आहे. रात्री ८ नंतर या ठिकाणी महिला, तसेच मुलींना घराबाहेर पडण्यासदेखील भीती वाटते. प्रभागात भर दिवसा गैरव्यवहार प्रकार सुरू असतात. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. रात्री काही मद्यपी दारू पिऊन नागरिकांच्या घरांसमोर शिवीगाळ करतात. नागरिकांना अडवून लूटमारीचे प्रकार सर्रास घडतात.या भागातील गुन्हेगारींचे प्रमाण वाढत चालले आहे. भांडणे, शिवीगाळ असे प्रकार सतत होताना दिसतात. या सर्व कारणांमुळे तेथील नागरिक त्रस्त आहेत. पोलिसांनी यासंदर्भात कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.प्रभागात अस्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे. ज्याला वाटेल तो त्या ठिकाणी कचरा टाकून जातो. नागरिकांना अस्वच्छ परिसरात वावर करावा लागतआहे. काही घरासमोरच कचरा टाकला जातो. यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे.आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होतआहे. कचऱ्यामुळे प्रदूषण वाढत असून, त्याचा विपरीत परिणाम दिसत आहे. अस्वच्छता, दुर्गंधी आणि असुरक्षिततेतून सुटका व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
सुरक्षित, स्वच्छ प्रभागाची अपेक्षा
By admin | Updated: January 14, 2017 02:55 IST