'या' ५ आव्हानांना पार केल्याशिवाय निवडणुकीत भाजपाचा विजयी रथ रोखणं काँग्रेसला कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 01:22 PM2024-04-15T13:22:56+5:302024-04-15T13:27:36+5:30

lok sabha Election - येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं अबकी बार ४०० पार यासाठी प्रयत्न सुरू केलेत. तर काँग्रेसनंही इंडिया आघाडीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना सत्तेतून खाली खेचण्याचा डाव आखला आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. एका एका जागेसाठी रणनीती आखली जात आहे. सत्ताधारी भाजपाने 'अबकी बार ४०० पार'ची घोषणा दिली आहे. तर विरोधी इंडिया आघाडीनंही नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यापासून रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३७.७ टक्के मतांसह ३०३ जागांवर यश मिळालं होतं. काँग्रेसला १९.७ टक्के मतांसह ५२ जागा तर अन्य ३०.९ टक्के मतांसह ११६ जागांवर विजयी झाले होते. इतरांमध्ये सपा-बसपा, बीजेडी, बीआरएस, केरळमधील डाव्या पक्षांचाही समावेश आहे.

काँग्रेसनं भाजपाचा विजयी रथ अडवण्यासाठी यूपी, बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी केली आहे. इंडिया आघाडी एनडीएचा विजय रोखू शकते अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. परंतु या आघाडीमुळे खरेच काँग्रेस भाजपाला सत्तेपासून रोखेल का असा प्रश्न उभा राहत आहे.

लोकसभेत देशात एकूण ५४३ जागांवर निवडणूक होत आहे. त्यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातसारख्या राज्यात जवळपास २०० जागा आहेत ज्याठिकाणी भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. २०१४ आणि २०१९ ची निवडणूक पाहिली तर यातील ९० टक्के जागा जिंकण्यात भाजपाला यश आलंय.

मागील निवडणुकीत भाजपानं ज्या जागा जिंकल्या त्यातील ४० जागांवर ५० हजारांपेक्षा कमी मताधिक्य आहे. त्यातील ११ जागांवर काँग्रेस-भाजपा लढत झालीय. त्यामुळे जर भाजपाला हरवायचं असेल तर काँग्रेसला स्ट्राईक रेटमध्ये सुधारणा करणं गरजेचे आहे. २०१९ मध्ये २०७ अशा जागा आहेत जिथं काँग्रेसला ३० टक्के अथवा त्याहून अधिक मते मिळाली आहेत. त्याठिकाणी स्ट्राईक रेट काँग्रेसला सुधारणं आवश्यक आहे.

भाजपाला हिंदी भाषिक यूपी, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि केंद्र शासित राज्यात ५० टक्क्याहून अधिक मते घेतली. त्या राज्यात मते वाढवण्याचं आव्हान काँग्रेसला आहे. यूपीत काँग्रेसनं सपासोबत युती केलीय. ज्यामुळे विरोधी पक्षांच्या मतात विभाजन होणार नाही. युती आणि आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसनं भाजपाचं मताधिक्य कमी करणे आणि विरोधी पक्षाच्या मतांमध्ये फूट न होऊ देण्याची रणनीती आखली आहे.

काँग्रेसला यूपी, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्रासारख्या राज्यात एक-एक, पश्चिम बंगालमध्ये २ जागांवर भाजपानं गेल्या निवडणुकीत रोखलं होते. राजस्थान, गुजरात, हिमाचल, हरियाणा, दिल्लीमध्ये खातेही उघडले नाही. या राज्यात यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला त्यांची कामगिरी सुधारून खासदार निवडून आणावे लागतील.

काँग्रेसला दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक जो पक्षाचा मुख्य मतदार आहे जो आता विविध पक्षांसोबत विभागला गेला आहे. त्या सर्वांना एकत्रित करून आपल्याकडे खेचायचे आहे. इंडिया आघाडीमुळे अनेक ठिकाणी विरोधकांचे मतविभाजन कमी करणं काँग्रेससाठी आव्हान आहे.

पूर्वोत्तर भारतात लोकसभेच्या २५ जागा आहेत. त्यातील ४ काँग्रेसकडे आहेत. यातील २१ जागांवर २०१९ च्या निवडणुकीत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना यश मिळालं. काँग्रेसला दक्षिण भारतातील मतदारसंघातून सर्वाधिक अपेक्षा आहेत. त्याठिकाणी भाजपाला रोखून उत्तरेतील जागा वाढवण्यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागतील

काँग्रेसनं २०१९ च्या निवडणुकीत एकूण ४२१ जागा लढवल्या. त्यातील ५२ जागांवर यश मिळालं. काँग्रेसच्या पराभवातील ११ जागा अशा आहेत जिथं १० टक्क्याहून कमी मताधिक्य आहे. २०२४ च्या निवडणुकीत यातील किमान अर्ध्या जागा जिंकणे काँग्रेसचं लक्ष आहे.