परभणी : वाढत्या उन्हाचा फटका पाणीसाठ्यात घट होण्यावर झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा मागील सात दिवसांत तीन टक्क्यांनी घटला आहे. यासाठी पाणी वितरणासह बाष्पीभवनाचाही परिणाम झाला आहे.
गंगाखेड शहरातील ७० टक्के भागाला व तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या गावांना मासोळी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये २२ एप्रिलपर्यंत ४० टक्के पाणी उपलब्ध आहे. या प्रकल्पाची पाणी पातळी ४१२.८० मीटर तर एकूण साठा १७.८८२ इतका आहे. यातील उपयुक्त साठा १०.९४२ इतका आहे. गतवर्षी याचदिवशी प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मासोळी मध्यम प्रकल्प प्रशासनाने दिनांक १६ ते २२ एप्रिल दरम्यान साप्ताहिक पाणीपातळी तपासून त्याचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये १६ एप्रिल रोजी ४३ टक्के तर २२ एप्रिल रोजी ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सात दिवसात तीन टक्के पाणीसाठा घटला आहे. ही घट पाणी वितरण अथवा बाष्पीभवन यामुळे झाली असावी, असा अंदाज आहे. अजून दीड महिना हे पाणी पुरेल, यासाठीचे नियोजन करुन प्रशासनाला पाणी वितरण करावे लागणार आहे.