जिल्ह्यात गावा गावात गणेश मूर्तिकार आपल्या कुटुंबाची उपजीविका मूर्ती बनविण्यावर भागवितात। शाडू माती आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणार्या पीओपीच्या मुर्त्या वर्षभर या व्यवसायिकांकडून विक्री केल्या जात आहेत. मात्र केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नव्या मार्गदर्शक तत्वातील जाचक अटीमुळे पीओपी मूर्तींवर बंदी येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास लाखो कुटुंबीयांचे व्यवसाय देशोधडीला लागतील. पीओपी ही देखील राजस्थानातील माती आहे. त्यावर कुठलीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. भाजणे, दळणे आणि चाळणे एवढ्याच प्रक्रियेतून पीओपी तयार केले जाते. त्यामुळे पीओपीच्या वापराला बंदी आणणे चुकीचे आहे. पीओपीचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. त्यात घराचे सुशोभिकरण करणे, जलशुद्धीकरण करणे, पक्ष्यांचे खाद्य, शेतीचा पोत सुधारण्यासाठी व वैद्यकीय उपयोगासाठी आणि रस्ते बांधणी बांधणीच्या कामातही पीओपी वापरला जातो. त्यामुळे पीओपीला बंदी आणली तर जिल्ह्यातील अनेक मूर्तिकार व त्यावरील कामगार वर्गाचे हाल होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मूर्ती बनविणारे साधारणतः १ हजार कारखाने आहेत. तेव्हा पीओपीवर बंदी आणू नये, अशी मागणी श्री गणेश मूर्तिकार प्रतिष्ठान संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पीओपीच्या बंदीला मूर्तिकारांच्या विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST