दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सर्वसाधारणपणे पदवी अभ्यासक्रमाचा तुलनेत व्यवसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आतापर्यंत प्रवेश मिळण्यासाठी मोठी स्पर्धा होती. मात्र, यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे उमेदवारांच्या अर्जांची संख्या घटली आहे.
यंदा कमी अर्ज आल्याची वेगवेगळी कारणे असली तरी परभणी जिल्ह्यातून मात्र ४ हजार ६३१ उमेदवारांनी आयटीआयसाठी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, आयटीआयसाठी २ हजार ४३२ एवढ्याच जागा आहेत. त्यामुळे आयटीआयला प्रवेश मिळण्यासाठी निश्चितच स्पर्धा होणार आहे. जिल्ह्याचा विचार करता परभणी तालुक्यातील सर्वाधिक १ हजार ३९८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १ हजार ३७१ विद्यार्थ्यांचे अर्ज कन्फर्म झाले आहेत. सेलू तालुक्यातील सर्वात कमी २१६ विद्यार्थ्यांचे अर्ज आतापर्यंत कन्फर्म झाले आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेश कार्यक्रमानुसार विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.
तालुकानिहाय कन्फर्म झालेले अर्ज
गंगाखेड ७८७
जिंतूर ५०७
मानवत २५७
पालम २८३
परभणी १३७१
पाथरी ३९२
पूर्णा ४९९
सेलू २१६
सोनपेठ ३१८