मराठवाडा नगरपरिषद व मनपा कामगार कर्मचारी युनियन लाल बावटा या संघटनेने २२ फेब्रुवारी रोजी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले होते. यावेळी मनपा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी कामगारांच्या मागण्या एक महिन्याच्या आत मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले होते.
मनपा प्रशासनाने आश्वासन देऊन आता दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, मागण्यांबाबत कोणतीही ठोस अंमलबजावणी करण्यात आली नाही. १२ व ते २४ वर्षे कालबद्ध पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित आहेत, रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमानुसार नोकरीत कायम करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले असताना मनपा प्रशासनाने मात्र आतापर्यंत कोणतीही प्रक्रिया केली नाही. ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केले, त्यापैकी दोघांना १९०० रुपयांचा ग्रेड पे देण्याचे आदेश असताना २८०० रुपयांचा ग्रेड पे देण्यात आला. त्याबाबतही काहीही कारवाई झाली नाही. शासन नियमानुसार पदोन्नती दिल्या नाहीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि ईद सणानिमित्त फेस्टिवल अद्यापपर्यंत वाटप झाले नाही. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाचा प्रशासनाला विसर पडला आहे. या आश्वासनांची येत्या आठ दिवसात अंमलबजावणी करावी अन्यथा पुन्हा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा लाल बावटाच्या माधुरी क्षीरसागर, आवेस हाशमी, जालिंदर कांबळे आदींनी दिला आहे.