गंगाखेड : शहरातील नांदेड रेल्वे गेटवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पाच वर्षांपासून अपूर्णच आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाईलाजास्तव वळण रस्त्याचा वापर करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत.
२०१० मध्ये उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी गंगाखेड शहरातील नांदेड रेल्वे गेट परिसरात वळण रस्ता काढण्यात आला. २०१२ मध्ये रेल्वे विभागाने त्यांच्या हद्दीतील उड्डाणपुलाचे काम सुरू केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील उड्डाणपुलाच्या कामाचा २०१६ मध्ये प्रारंभ झाला. पाच वर्षे उलटूनही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी पुन्हा एकदा वळण रस्ता काढण्यात आला. सद्यस्थितीत या वळण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे दहा वर्षे उलटूनही अद्याप या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव वाहनधारकांना वळण रस्त्याचा वापर करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.