जिल्ह्यात वाढला वाळूचा अवैध उपसा
परभणी : जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले असले, तरी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन सातत्याने वाळू उपशाविरुद्ध कारवाई करीत असताना हा वाळू उपसा अद्यापही कमी झाला नाही. त्यामुळे खुल्या बाजारात वाळूचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तेव्हा जिल्ह्यातील वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.
दुभाजक नसल्याने वाढले अपघात
परभणी : येथील वसमत रस्त्यावरील खानापूर फाट्याच्या समोर रस्त्यावर दुभाजक नसल्याने किरकोळ अपघात होत आहेत. या भागात सध्या नवीन वसाहती वाढल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही वाढली आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते खानापूर फाट्यापर्यंतच दुभाजक टाकलेले आहे. हे दुभाजक पुढे दत्तधामपर्यंत वाढवावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
पाणीविक्रीच्या व्यवसायाला सुरुवात
परभणी : जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागल असून, खासगी पाण्याचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला आहे. नळ योजनेद्वारे नियमित आणि मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने, अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्याचा फायदा उचलत खासगी व्यावसायिकांनी पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातच अनेक भागांत नळ योजना पोहोचलेली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात बोअरचे पाणी आटल्यानंतर खासगी पाणी व्यावसायिकांवरच नागरिकांची भिस्त राहत आहे.
रेल्वे स्थानकावर वाढली प्रवाशांची संख्या
परभणी : शहरातील रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांची संख्या वाढली आहे. नांदेड-मनमाड या मार्गावर रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. सध्या आरक्षणासह रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे. बससेवेच्या तुलनेत हा प्रवास सुरक्षित असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या प्रवासालाच महत्त्व दिले असून, रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या वाढली आहे.
कालव्यावरील पुलाची दुरवस्था
परभणी : शहरातील जिंतूर रस्त्यावरील जायकवाडी कालव्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलावरील रस्ता जागोजागी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडखळत वाहने चालवावी लागत आहेत. मागील अनेक वर्षांपासूनची ही समस्या आहे. तेव्हा पुलावरील या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.