गत पाच वर्षात मुलींच्या जन्मदरात खूपच घट होऊन तो जन्मदर ७७०पर्यंत कमी झाला होता. मुलींच्या कमी जन्मदरामुळे प्रशासन चिंता व्यक्त करीत होते. याला पर्याय म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ यासह स्त्री जन्माचे स्वागत हे उपक्रम राबवले. त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गर्भवती मातेची वेळोवेळी तपासणी करणे, त्यांना सकस आहार पुरविणे, या सुविधांमुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत होत आहे. नजीकच्या काळात स्त्री भ्रूण हत्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टर मंडळींनी प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान बंद केले आहे. त्यामुळे गर्भलिंग चाचणी करून घेणारे दाम्पत्य यांचा पर्याय नाहीसा झाल्याने महिलांचे गर्भपात करून घेण्यावर एकप्रकारे निर्बंध आले आहेत. त्यामुळे यावर्षी मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याचे आशादायक चित्र समोर येत आहे. ९ महिन्यांच्या नोंदीनुसार २९८ मुलगे, तर २९१ मुलींचा जन्म झाला असून, त्याचा जन्मदर हा १ हजार मुलांमागे ९७६ मुली असा असून तो वाढत आहे. असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
मागील ९ महिन्यातील मुलींचा जन्मदर
एप्रिल (मुलगे २२, मुली २४)
मे (मुलगे २१, मुली २४)
जून (मुलगे १४, मुली १७)
जुलै (मुलगे ४३, मुली ३१)
ऑगस्ट ( मुलगे ४८, मुली ३७)
सप्टेंबर ( मुलगे ३६, मुली ४०)
ऑक्टोबर ( मुलगे ४६, मुली ४७)
नोव्हेंबर( मुलगे ३५, मुली ४०)
डिसेंबर ( मुलगे ३३, मुली ३१)
शासनाच्या योजना ठरल्या फलदायी
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत शासनाकडून महिलांकरिता अनुदान रक्कम दिली जात असल्यामुळेही मुलींच्या जन्मदरात वाढ होत असून, ती आशादायक अशीच आहे. त्याचबरोबर स्त्रीभ्रूणहत्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या नियमांचे पालन करून सोनोग्राफी व एमटीपी केंद्राची नियमित तपासणी करण्यात येते.
सेलू तालुक्यात अनियमितता दिसून येत नसल्याने मुलींच्या जन्मदरात वाढ होत आहे. सद्यस्थितीत हे प्रमाण चांगले आहे, ही समाधानाची बाब आहे.
डॉ. संजय हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, सेलू.