जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून आरटीपीसीआर तपासणी संख्या वाढविण्यात आली आहे. रविवारी १ हजार ५१३ नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरमध्ये ४ तर रॅपिड टेस्टमध्ये दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात आता एकूण ७ हजार ६२८ रुग्णसंख्या झाली आहे. त्यातील ७ हजार २३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ३०५ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. ८४ रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी दिवसभरात परभणी तालुक्यातील झरी येथील ४५ वर्षीय महिला, शहरातील दादाराव प्लॉट भागातील ४५ वर्षीय महिला, जागृती कॉलनीतील ४९ वर्षीय पुरुष, गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील ५५ वर्षीय महिला, मानवत शहरातील रंगार गल्ली येथील ६२ वर्षीय पुरुष आणि नांदेड शहरातील रामानंदनगर येथील ४५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. कोरोनाबाधित ठरलेल्या ६ रुग्णांमध्ये ३ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बाधित रुग्णांपैकी सर्व रुग्ण ३५ वर्षांपुढील वयोगटातील आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर आतापर्यंत सर्वात कमी रुग्ण रविवारी नाेंद झाले आहेत. त्यामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात घटल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
जिल्ह्यात नवे ६ रुग्ण; १२ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST