-असं उत्तर तरुणांनी दिलंतर पालक विश्वास ठेवतील?-माधुरी पेठकरफेसबुक, व्हॉटसअॅपसारखी समाज माध्यमं ( सोशल मीडिया) संवादासाठी आता मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. या माध्यमांवर तरूणांची पकड जास्त आहे. किंबहुना तरूणांवरच या सामाजिक माध्यमांची पकड घट्ट बसली आहे असंही म्हणता येईल!
सोशल मीडीयाशिवाय एक क्षणही तरूण मंडळी राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. एकवेळ कोणी घरात बोलायला नसलं तरी चालेल पण स्मार्ट फोनमधला डेटा म्यूट असला की तरूण जग हल्ली अस्वस्थ व्हायला लागतं. मुलांचा सोशल मीडियावरचा वावर आणि फोनचा वापर बघून पालक अस्वस्थ होता आहेत. एकीकडे घरी मुलांना स्मार्ट फोनपासून दूर ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात तर दुसरीकडे शाळाच मुलांना टॅबलेटसारख्या साधनांची ओळख करून देतात. मुलांचं लक्ष विचलित करणारी ही साधनं ठरवूनही मुलांपासून दूर नेता येत नाहीत हे आजचं वास्तव आहे.
इतकंच नाही तर अभ्यास टाळून सोशल मीडियावर टाइमपास करणारी मुलं आता अभ्यासासाठीही सोशल मीडियाचाच वापर करत आहे, असंही एक नवीन निरीक्षण आहे. शाळा-कॉलेजातल्या असाइनमेण्ट्स मुलं आता या सोशल मीडियाचा वापर करूनच पूर्ण लागू लागली आहेत.
नुकतंच एक देशव्यापी सर्वेक्षण झालं.त्यातले निष्कर्ष शाळकरी मुलं आणि सोशल मीडियाचे संबंध किती आणि कसे घनिष्ठ आहेत हेच सांगत आहेत.टाटा कन्सलटन्सी सव्हिसेस अर्थात टीसीएसने देशभरातल्या पंधरा शहरातल्या माध्यमिक शाळेत जाणाऱ्या १३,०० शाळकरी मुलांच्या मुलाखती घेवून हे सर्व्हेक्षण केलं.
मोठ्या शहरातली मुलं साहजिकच स्मार्ट फोनचा किंवा सोशल मीडियाचा वापर जास्त करत असतील अशी सामान्यत: अटकळ असते. पण या सर्व्हेक्षणातून मुंबई या मेट्रो शहरपेक्षा पुणे आणि विझाग या टू टीअर शहरातल्या मुलांचं सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण जास्त दिसून आलं. पुण्यामधली ५४.२ टक्के मुलं आणि विझाग मधली ५३ टक्के मुलं शाळेतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी आॅनलाइन माध्यमांचा वापर करतात. त्या तुलनेत मुंबईचा अगदी चौथा क्रमांक लागतो.
मुंबई आणि दिल्ली या मेट्रो सिटीपेक्षा भुवनेश्वर, अहमदाबाद, लखनौ या तुलनेनं छोट्या असलेल्या शहरातली मुलं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असलेली दिसतात. मुबंई आणि दिल्लीमध्ये याचं प्रमाण ७७ टक्के आणि ८९ टक्के असं असताना भुवनेश्वरमध्ये हेच प्रमाण ९३ टक्के, अहमदाबाद मध्ये ९१ टक्के आणि लखनौमध्ये ९१ टक्के आहे.
सोशल मीडियाच्या वापरामध्ये छोट्या छोट्या शहरांनी बड्या शहरांना मागे टाकण्याच्या कारणांचा सर्वेक्षणा दरम्यान जरा खोलात विचार केल्यावर असं दिसून आलं की मेट्रो शहरात छोट्या शहरांच्या तुलनेत मुलांना मन रमवण्यासाठी मॉलसारखी खूप ठिकाणं आहेत. छोट्या शहरांमध्ये ती नाहीयेत असं नाही पण तुलनेनं कमी. आणि प्रत्येकालाच तिथे जाणं शक्य होतं असं नाही. त्यामुळे छोट्या शहरातली मुलं आपलं मन रमवण्यासाठी हातातल्या स्मार्ट फोनचा वापर करून आॅनलाइन जास्त राहतात, टाइमपास करतात.
मुलं मोठ्या प्रमाणात आॅनलाइन आहेत, त्यांचा सोशल मीडियाचा वापर खूप वाढलाय हे दिसून येत असलं तरी सर्वेक्षणातल्या आकडेवारीची तुलना मागच्या वर्षीच्या आकडेवारीशी करता यात घट दिसून येत आहे. त्यापाठीमागे पालकांची भूमिका मोठी असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियाबाबत मुलं ऐकेनाशी झालेली असली तरी पालकही आपला धाक दाखवून, ओरडून, रागवून मुलांना या जगापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ५० टक्के विद्यार्थी म्हणतात, आमचे पालक आम्हाला कसंबसं सोशल मीडियावर बोलू देतात. मागच्या वर्षी असं सांगणाऱ्या मुलांचं प्रमाण ६० टक्के होतं. अनेक पालक आपल्या मुलांना विशिष्ट बंधन घालूनच आॅनलाइन वावरण्याची मुभा देत आहेत. काही पालकांनी तर फोनमध्ये असं सॉफ्टवेअरच घालून ठेवलंय जे मुलांना नको त्या गोष्टींकडे वळण्याची परवानगी देत नाही .
सोशल मीडियाकडे मुलांची ओढ आणि पालकांची नापसंती अशी टोकाची भूमिका या सर्व्हेक्षणात आढळून आली. सोशल मीडियाच्या अतिवापरानं मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या नकारात्म्क परिणामांमुळे सोशल मीडिया म्हणजे पालकांना मुलांच्या आयुष्यातलं भूत वाटतं. या भूतानं झपाटल्यानं मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होतो आहे. तास न तास फोन-कम्प्युटरच्या स्क्रिनसमोर असल्यानं मुलांच्या डोळ्यातला ओलावा कमी होवून डोळ्यांच्या समस्येत वाढ होते आहे. मुलं या भुताच्या मागे लागून रात्र रात्र जागता आहेत, हव्या त्या गोष्टींकडे मुलांचं दुर्लक्ष होतय या सर्व कारणांमुळेच शाळापातळीवर मुलांच्या हातात टॅब नको म्हणून पालक शाळांच्या भूमिकांविरूध्द आंदोलन उभारत आहेत. आपआपल्या परीनं मुलांना सोशल मीडियापासून लांब राहण्यासाठी समजून सांगता आहेत. सोशल मीडियाचा प्रभाव बघता या एका कारणामुळे मुलं आणि पालक यांच्यातला संघर्ष सतत वाढणार एवढं मात्र खरं. अभ्यासासाठी आॅनलाइन?मुंबईतले ७०.८ % विद्यार्थी कुठेही असले तरी १५ ते १८० मिनिटं सोशल मीडियावर आपला वेळ घालवतात. ४८.२% मुलं शाळेच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाचा वापर करतात.४७.७% मुलं अभ्यासासाठी व्हिडिओ चॅट करतात. त्यातले २२.२% मुलं व्हिडिओ चॅटिंगद्वारे नवीन छंद शिकतात. १७.७% मुलं शाळेतल्या चाचणी परिक्षांची तयारी आणि २०.८ % मुलं शाळेनं दिलेल्या असाइनमेण्ट्सा पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ चॅटिंगचा आधार घेतात.
आपल्याच आई बाबांशी, आजी आजोबांशी व्हिडिओ चॅटिंगद्वारे संपर्क साधून बोलणाऱ्या मुलांच प्रमाण थोडथिडकं नसून ५५.६ टक्के आहे. शाळेच्या अभ्यासाबाबत, असाइनमेण्टस बाबत एकमेकांशी चर्चा करता यावी यासाठी मुलं व्हॉटसअॅपवर ग्रूप करता आहेत.