नको हे एवढे सगळे ऑप्शन्स डॉक्टर, त्यापेक्षा सरळसोट एकामार्गानं गेलेलं बरं होतं.
पूर्वी लग्नासाठी मुलगी घरचेच पसंत करायचे आणि ते म्हणतील त्या मुलीशी निमूट लग्न करावं लागायचं, काही चॉईसच नसायचा. जे जसं मिळेल तसं निभवायचं जन्मभर, ते बरं होतं की आत्ताचा काळ. आपल्याला पाहून, प्रेमात पडून, निवडून स्वत:साठी मुलगी शोधता येते. लग्न करताना जोडीदार आपण अनेक पर्यायांतून निवडतो.
मग तोच नियम करिअर आणि शिक्षणालाही लावला तर इतक्या जास्त संधी, इतकी जास्त क्षेत्रं, इतक्या जास्त वाटा हे सारं आपल्याला वरदानच वाटलं पाहिंजे. नव्हे ते वरदान आहेच. आपल्याला आपलं आयुष्य आपल्या मनासारखं घडवण्याची संधी मिळते आहे, असाच विचार तरुण मुलांनी करायला हवा.
पण ते तसा करत नाहीत कारण विचार करून निर्णय घ्यायला जो निवांतपणा हवा तोच त्यांच्याकडे नाही.
ही मुलं एक्झॉस्ट झालेली असतात. रोज उठलं की तेच, तेच कॉलेज, तेच क्लास, त्याच ऑदर अँक्टिव्हिटी आपल्याला कोर व्हायचंय याची ती भलीमोठी ध्येयं.
या सार्याचा काच मुलांच्या गळ्याशी लागतो आहे. त्यामुळेच समोर अनेक पर्याय दिसत असूनही ही मुलं अत्यंत सैरभैर झालेली दिसतात.
त्यांना माहिती भरपूर असते पण त्यांचं ठरत काहीच नाही.
आणि हे ठरत काही नाही तर त्यांना सतत आईवडील भीती दाखवतात की, तुझं चुकलं तर जबाबदार तूच.
त्यातून अनेक मुलं ठाम निर्णयापर्यंत येत नाहीत.
ऑनलाइन कोर्सेसची भुरळ
खरंतर मुक्त विद्यापीठापासून ते बाह्य विद्यार्थी म्हणून शिक्षण घेण्याच्या अनेक सोयी असताना हल्ली अनेक मुलं ऑनलाइन कोर्सेसच्या प्रेमात पडलेली दिसतात. ऑनलाइन कोर्स करूच नये, त्यात तुम्ही फसवलेच जाता असं काही नाही; पण आपण कशाचा ऑनलाइन कोर्स करतो आहोत हेसुद्धा अनेक जण नीट गांभीर्यानं तपासून पाहत नाहीत. फॅशन डिझायनिंगचा ऑनलाइन कोर्स करतो, असं हल्ली अनेक जण सांगतात. फॅशन डिझायनिंग ऑनलाइन कसं करता?
म्हणजे तुमची जर हातात कात्री कशी धरायची इथपासून सुरुवात असेल तर ऑनलाइन नुस्तं पाहून ते तुम्हाला कसं जमेल?
पण तरीही काही जणांना ऑनलाइन कोर्सेसची भुरळ पडते. अनेक जण तर त्यासाठी पैसे भरायचीही घाई करतात. शेवटी शिक्षण काही होतच नाही, पैसे बुडतात, वेळ वाया जातो आणि आपण हे काय करून बसलो याचा पश्चात्ताप होतो.
त्यामुळे ऑनलाइन कोर्स करणार असाल तर एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची. ऑनलाइन अभ्यासाचा उपयोग मुख्यत्वे स्कील अपग्रेड करण्यासाठी करावा. आधी पैसे न देता, जे फुकट आहे ते शिकून पहावे, पूर्ण खात्री झाल्यावरच ऑनलाइन पेड कोर्सेसचा विचार करावा.
गल्लीवाल्या आयटी कॉलेजात जाताय?
अनेक तालुक्यांच्या गावी किंवा छोट्या शहरांतही ‘अमुकतमुक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालय’ अशी पाटी दिसते.
एखाद्या गल्लीत एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग कॉलेज नावाचा बोर्ड दिसतो.
कुठे एका खोलीत केटरिंग कॉलेज थाटलेलं दिसतं.
-तिथं आपण प्रवेश घ्यावा का? तर घेऊ नये हे इतकं साधं सोपं उत्तर.
पण बहुतेक मुलं या कॉलेजमध्ये अँडमिशन घेतात.
का घेतात?
तर झटपट नोकरीची आमिषं. चटकन पैसा. पदवी मिळाली की मोठ्ठा जॉब, अशा भुलाव्यांना ते भुलतात. त्यातून शिक्षण काही होत तर नाहीच, पण अनेकांना असं समाधान मात्र मिळतं की आपण काहीतरी मॉडर्न शिकतो आहोत. त्यात अनेक जण सांगतात की, ते रजिस्टर्ड कॉलेज आहे. रजिस्टर्ड म्हणजे नोंदणीकृत, सरकारमान्य नव्हे. या दोन शब्दांमधला फरकही आपण समजून घ्यायला हवा.
मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, अनेक छोट्या गावांतून येणारी, हताश निराश मुलं अशा कॉलेजात जाऊन स्वत:ला हरवून बसतात.
मग करायचं काय?
१) आपल्याला खूप पर्याय, खूप चॉईसेस आहेत याचा आनंद मानला तर त्यापैकी आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडतं हे ठरवणं सोपं होतं.
२) ते ठरवा.ठरवलं की हेच करायचं असं ठरवून सातत्यानं करायला लागा.
३) आपला निर्णय पुन्हा पुन्हा तपासून पहाण्याची काही गरज नाही, चुकला तर बेहत्तर.पण जे ठरवलंय ते करून पहाच.
४) आपल्या निर्णयाविषयी खूप बोलू नका, मित्रांशी तर कमीच बोला.कारण बोलून विषयाला फाटे फुटतात.
५) निर्णय घेण्यापूर्वी चर्चा, निर्णय झाला की चर्चा बंद काम सुरू.
ईमेलच्या जमान्यात पत्र-अभ्यास?
त्यातल्या त्यात बर्या कॉलेजातून एमबीए केलेल्या मुलांनाही जेमतेम पगाराची नोकरी मिळणं सध्या मुश्किल. अनेक एमबीए कॉलेजच्या जागा रिकाम्या राहतात. त्यात नोकरी देणारे म्हणतातच की अनेकदा एमबीए असलेल्यांनाही नोकरीवर घेताच ते कामाला लागतील अशी स्थिती नाही, ते नोकरी देण्यास ‘लायक’ नाही. असं असताना तेच अभ्यासक्रम पोस्टल करावेत का?
तर नाही.
मात्र सध्या नोकरी करून शिकणारे, असावी आपल्याकडे पदवी असा विचार करणारे अनेक जण पोस्टल अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्याचा ना अभ्यास करतात, ना गांभीर्यानं परीक्षा देतात. परिणाम तोच, एकतर पदवी मिळतच नाही आणि मिळाली तरी तिला कागदाच्या तुकड्यापेक्षा जास्त किंमत नाही.
त्यामुळे पोस्टल कोर्सला न जाता, थेट अभ्यासक्रमाला प्रवेश हा पर्याय बरा.