कटक : गोलंदाजांनी बजावलेल्या चोख कामगिरीनंतर रॉबिन उथप्पाच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाईटरायडर्सने आयपीएल-७ मध्ये बुधवारी मुंबई इंडियन्सला सहा गडी राखून सहज धूळ चारली. मुंबईला ५ बाद १४१ धावांत रोखल्यानंतर केकेआरने १८.४ षटकांत चार गडी गमावून १४२ धावा करीत विजय साजरा केला. उथप्पाने ५२ चेंडूंत सर्वाधिक ८० धावा ठोकल्या. त्यात नऊ चौकार व तीन षटकार होते. कर्णधार गौतम गंभीर आणि मनीष पांडे हे प्रत्येकी १४ धावा काढून परतले. युसूफ पठाणने १३ चेंडूंत तीन चौकारांसह नाबाद २० धावा केल्या. केकेआरचा दहा सामन्यांत पाचवा विजय असून, मुंबई संघ दहापैकी सातव्या सामन्यात पराभूत झाला. त्याआधी शिस्तबद्ध मारा करणार्या केकेआरच्या गोलंदाजांनी मुंबईला ५ बाद १४१ धावांत रोखले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने जीवदान मिळाल्यानंतर ४५ चेंडू टोलवून ५१ धावा ठोकल्या. त्यात चार चौकार आणि दोन षटकार होते. अंबाती रायुडूने ३३ धावांचे योगदान दिले. केकेआरकडून मोर्ने मोर्केल याने ३५ धावा देत २ गडी बाद केले. सुनील नारायण, पीयूष चावला आणि शाकिब अल हसन यांनीही एकेक गडी बाद केला. मुंबईला सुरुवातीपासूनच जलद आणि फिरकी मार्यापुढे धावा घेणे कठीण झाले होते. चिदंबरम गौतम ८, लेंडन सिमन्स १२ हे लवकर बाद झाल्यानंतर रोहित आणि रायुडू यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रायुडू चावलाच्या चेंडूवर झेलबाद झाला, पण रोहितचा लॉंग आॅनवर युसूफ पठाणने झेल सोडला. कोरी अॅण्डरसन १८, तर कीरोन पोलार्डने नाबाद दहा धावा केल्या. (वृत्तसंस्था)
केकेआरच्या विजयामुळे मुंबईच्या आशा धूसर
By admin | Updated: May 15, 2014 04:17 IST