कोलंबो : वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे संकेत देताना आज श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादशच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना एकापाठोपाठ माघारी परतवले. ईशांतच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने तीन दिवसीय सराव सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर पकड मजबूत केली. ईशांतने पहिल्या स्पेलमध्ये चार षटकांत पाच धावांच्या मोबदल्यात पाच फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. दिल्लीच्या या वेगवान गोलंदाजाने एकूण सात षटकांत २३ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. रविचंद्रन अश्विन व वरुण अॅरोन यांनी प्रत्येकी २ बळी घेत श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादशचा डाव १२१ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने पहिल्या डावात २३० धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. त्याआधी, भारताने अजिंक्य रहाणेच्या (१०९) शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३५१ धावांची मजल मारली.फलंदाजांना सराव मिळावा यासाठी विराट कोहलीने फॉलोआॅन न देता रोहित शर्माच्या साथीने स्वत: डावाची सुरुवात केली, पण हे दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. भारताने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद ११२ धावांची मजल मारली. भारताकडे एकूण ३४२ धावांची आघाडी आहे. आजचा खेळ थांबविण्यात आला त्यावेळी के.एल. राहुल (४७) आणि चेतेश्वर पुजारा (३१) खेळपट्टीवर होते.या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८४ धावांची अभेद्य भागीदारी केली. कोहली पहिल्या डावात केवळ ८ धावा काढून बाद झाला होता. आज त्याने डावाची सुरुवात केली, पण ३४ चेंडूंना सामोरे जाताना केवळ १८ धावा काढून माघारी परतला. पहिल्या डावात ७ धावा काढणारा रोहित दुसऱ्या डावात ८ धावा काढून बाद झाला. फलंदाजीचा सराव करण्यासाठी यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली, पण त्याचा त्याला लाभ घेता आला नाही. साहा बाद झाला त्यावेळी भारताची ३ बाद २८ अशी अवस्था होती.त्यानंतर राहुल व पुजारा यांनी डाव सावरला. पुजारा सुरुवातीला चाडपडत खेळत होता. राहुलने मात्र संघव्यस्थापनला जर मुरली विजय फिट नसेल तर पहिल्या कसोटीसाठी त्याचे स्थान घेण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास दिला. भारताने सकाळी पहिला डाव ६ बाद ३१४ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. रहाणे फलंदाजीसाठी उतरला नाही. अश्विनने २३ तर हरभजनने १५ धावा फटकावल्या. मध्यमगती गोलंदाज रजिताने सकाळच्या सत्रात दोन्ही विकेट घेतल्या. रजिताने ६८ धावांच्या मोबदल्यात पाच फलंदाजांना माघारी परतवले. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका एकादशच्या फलंदाजांवर ईशांतने वर्चस्व गाजवले. उपाहाराला खेळ थांबला त्यावेळी श्रीलंका अध्यक्ष एकादश संघाची ५ बाद ३५ अशी अवस्था होती. उपाहारानंतर वरुण अॅरोनने (२-४२) शेहान जयसूर्या (७) आणि मिलिंद श्रीवर्धने (३२) यांना लागोपाठच्या षटकांमध्ये माघारी परतवले. निरोसन डिकवाला (४१) आणि धुनष गुणतिलक (२८) यांनी आठव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करीत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. अश्विनने गुणतिलकला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर श्रीलंका एकादशचा डाव गुंडाळण्यासाठी अधिक वेळ लागला नाही. भारत पहिला डाव : लोकेश राहुल झे. गुणतिलका गो. निसाला थरका ४३, शिखर धवन झे. परेरा गो. कासुन रजिता ६२, रोहित शर्मा त्रि. गो. के. रजिता ०७, विराट कोहली झे. एम. श्रीवर्धने गो. रजिता ०८, अजिंक्य रहाणे (निवृत्त) १०९, चेतेश्वर पुजारा झे. एस. पथिराना गो. जे. वंडरसे ४२, वृद्धिमान साहा झे. थिरिमाने गो. वंडरसे ०३, रविचंद्रन अश्विन झे. थरंगा गो. रजिता २३, हरभजन सिंग त्रि. गो. गमागे १५, अमित मिश्रा झे. थिरिमाने गो. रजिता ००, भुवनेश्वर कुमार नाबाद ०९. अवांतर (३०). एकूण ८८.१ षटकांत सर्वबाद ३५१. श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादश :धनंजय डिसिल्वा त्रि. गो. ईशांत ००, कौशल सिल्वा पायचित गो. ईशांत ००, लाहिरू थिरिमाने झे. राहुल गो. ईशांत ०५, उपुल थरंगा पायचित गो. ईशांत ००, मिलिंद श्रीवर्धना झे. साहा गो. अॅरोन ३२, कौशल परेरा त्रि. गो. ईशांत ००, स्नेहन जयसूर्या झे. साहा गो. अॅरोन ०७, निरोशान डिकवाला त्रि. गो. अश्विन ४१, धनुष्का गुणतिलका झे. उमेश गो. अश्विन २८, निसला थराका पायचित गो. हरभजन ०२, के. रजिता नाबाद ००. अवांतर (६). एकूण ३१ षटकांत सर्वबाद १२१. भारत दुसरा डाव :रोहित शर्मा पायचित गो. फर्नांडो ०८, विराट कोहली झे. पथिरना गो. रजिता १८, वृद्धिमान साहा पायचित गो. फर्नांडो ०१, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ३१, लोकेश राहुल खेळत आहे ४७. अवांतर (७). एकूण ४० षटकांत ३ बाद ११२.(वृत्तसंस्था)
ईशांतने धाडला निम्मा संघ तंबूत
By admin | Updated: August 7, 2015 22:37 IST