मुंबई : संघातील मतभेद, कर्णधार -पदावरून रस्सीखेच आणि रुसवे-फुगवे सुरू असतानाच आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे आले आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर तब्बल २० वर्षांनी मुंबईकर क्रिकेटपटूकडे कर्णधारपदाची धुरा आली आहे. बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत अजिंक्यला तीनपैकी दोन सामन्यात डच्चू देण्यात आला होता. त्यावरूनही धोनीला टीकेचे धनी बनविण्यात आले होते. आता येत्या १० जुलैपासून सुरू होत असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात अजिंक्यला थेट कर्णधार बनविण्यात आले आहे. सप्टेंबर २०११मध्ये टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या अजिंक्यने ५५ एकदिवसीय सामन्यांत १ हजार ५९३ धावा तडकावल्या आहेत.