ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - ख्यातनाम नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरुरने नेमबाजीचे प्रशिक्षक स्टॅनिस्लाव्ह लॅपिडस यांच्याविरोधात महिला खेळाडूंशी गैरवर्तन केल्याची खोटी तक्रार केल्याचे नमूद करत नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) लेपिडस यांना क्लीन चिट दिली आहे.
भारतीय नेमबाजीतील महिला खेळाडू अंजली भागवत, सुमा शिरुर, आयोनिका पॉल, कुहेली गांगुली, तेजस्विनी सावंत, लज्जा गोस्वामी यांनी नेमबाजीचे प्रशिक्षक लॅपिडस यांच्याविरोधात संघटनेकडे तक्रार केली होती. लॅपिडस यांनी कनिष्ठ महिला नेमबाजांकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचे या तक्रारीत म्हटले होते. यात भर म्हणजे खासगी प्रशिक्षण देण्याचे आश्वासन देत लॅपिडस यांनी काही ज्यूनिअर महिला खेळाडूंसोबत शारीरीक संबंधही ठेवले असा धक्कादायक आरोप ऑलिम्पिक खेळाडू संजीव राजपूत यांनी केला होता. या प्रकरणामुळे नेमबाजी विश्वात एकच खळबळ उडाली होती. एनआरएआयने या प्रकरणाची चौकशी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले नाही असे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले. काही खेळाडूंनी जाणूनबुजून संघटनेची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे असा आरोप एनआरएआयचे प्रमुख राणिंदर सिंह यांनी केला आहे. 'भागवत व अन्य खेळाडूंनी आम्हाला लॅपिडस यांच्याविरोधात एकही पुरावा दिला नाही. याऊलट रागाच्या भरात ही तक्रार नोंदवली अशी कबुलीच भागवते दिल्याचे सिंह यांनी एका वृत्तपत्राला सांगितले आहे. लॅपिडस हे कडक शिस्तीचे प्रशिक्षक असून त्यांचे काही खेळाडू व संजीव राजपूत यांच्यासोबत वादही झाले होते अशी माहिती आता समोर आली आहे.
खेळाडूंच्या तक्रारीनंतर परदेशी प्रशिक्षक लॅपिडस यांना धक्काच बसला, त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र सध्या तेच भारताचे प्रशिक्षक असतील असे सिंह यांनी सांगितले. दरम्यान, एनआरएआयने हे प्रकरण सखोल चौकशीसाठी अॅथेलेटिक्स संघटनेकडे सोपवले आहे.