नवी मुंबई : ऐरोली येथील दत्ता मेघे इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्रथम वर्षात शिकणाऱ्या हर्षशिल शंभरकर याला त्याच्याकडून पालकांच्या अपेक्षाभंग होण्याची भीती सतावत होती. याच भीतीने त्याने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.मूळचा नागपूरचा हर्षशिल शंभरकर हा इंजिनीअरिंगच्या शिक्षणानिमित्ताने ऐरोलीत आला होता. त्याला बारावीत ४० टक्के गुण मिळाले होते. बारावीनंतर त्याने इंजिनीअरिंग करावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. रिक्षा चालवून कुटुंब चालवणारे वडील ताराचंद यांना हर्षशिलकडून खूप अपेक्षा होत्या. यामुळे त्यांनी मोठ्या जिद्दीने आरक्षण कोट्यातून हर्षशिल याला इंजिनीअरिंगसाठी प्रवेश मिळवून दिला होता. यानुसार तो शिक्षणासाठी नवी मुंबईत आला असता ऐरोली सेक्टर २ येथे भाड्याच्या घरात राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची प्रथम वर्षाची परीक्षा झाली होती. या परीक्षेत कमी गुण मिळतील अथवा नापास होण्याची भीती त्याला सतावत होती. ही बाब त्याने काही वर्गमित्रांना देखील बोलून दाखवली होती. घरच्यांना समजल्यास वडील नाराज होतील याचीही भीती त्याला वाटत होती. यामुळे १७ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात गळफास लावून त्याने आत्महत्या केली. (प्रतिनिधी)
अपेक्षांच्या ओझ्यामुळे गमावला तरुणाने प्राण
By admin | Updated: February 22, 2016 00:33 IST