नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा सराईत चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ८८ हजारांचे दागिने जप्त करण्यात असून अठरा गुन्ह्यांची उकल झाली आहे. शहरात घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा पोलिसांनी कंबर कसली आहे. उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून सराईत सोनसाखळी चोरांचा शोध घेतला आहे. यादरम्यान मध्यवर्ती कक्ष व कक्ष दोनच्या पथकांनी दोघा इराणी सोनसाखळी चोरांना अटक केली आहे. जाफर इराणी (२१) व कंबरअली इराणी अशी त्यांची नावे आहेत. जाफर हा अल्पवयीन असल्यापासून सोनसाखळी चोरी करत आहे. त्याच्यावर आयुक्तालयातील आठहून अधिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वाशीतील एका गुन्ह्यात २०१४ साली त्याला मोक्का देखील लावण्यात आलेला आहे. तो मुंबई, ठाणे पोलिसांना देखील पाहिजे आहे. त्याच्या सध्याच्या ठिकाणाची माहिती मध्यवर्ती कक्षाच्या अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने वेशांतर करून सापळा रचून जाफरला अटक केली. चौकशीत त्याने पाच गुन्ह्यांची कबुली दिली असून ६ लाख ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. राज्यात व राज्याबाहेरही अनेक ठिकाणी सोनसाखळी चोरी करणारा कंबरअली हा कोल्हापूरमध्ये असल्याची माहिती कक्ष दोनच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक एन. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किरण भोसले, बबन जगताप, सुभाष पुजारी यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याने नवी मुंबई आयुक्तालयात केलेल्या १३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार सदर गुन्ह्यामधील ८ लाख ७९ हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. दोन पथकाच्या कारवायांमध्ये एकूण १४ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)
दोन इराणी सोनसाखळी चोरांना अटक
By admin | Updated: October 28, 2016 03:56 IST