नवी मुंबई : बेलापूर येथील तरुणाच्या मृत्यूला पोलिसांना जबाबदार धरत नातेवाइकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात नेल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. बेपत्ता महिलेच्या तपासाकरिता पोलिसांनी या तरुणाला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर काही तासातच या तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आल्याने त्याने पोलिसांच्या भीतीने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.राहुल पाटील (२६) असे मयत तरुणाचे नाव असून तो बेलापूर गावचा राहणारा आहे. गुरुवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सीवूड ते बेलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर आढळला. रेल्वे अंगावरुन गेल्याने त्याच्या शरिराचे दोन तुकडे झाले आहेत. याप्रकरणी त्याच्या मृत्यूची नोंद पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर राहुल याचा मृत्यू अपघाती आहे की,आत्महत्या याबाबतचा उलगडा झालेला नाही. परंतु राहुल याने पोलिसांच्या भीतीने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी त्यांनी राहुलचा मृतदेह एनआरआय पोलीस ठाण्यात नेला. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह दीडशेहून अधिक नागरिकांच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. अखेर पोलिसांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी अंत्यविधीसाठी मृतदेह नेला.बेलापूर परिसरात राहणारी एक विवाहित महिला १० फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार एनआरआय पोलीस ठाण्यात दाखल आहे. तपासादरम्यान ही बेपत्ता महिला राहुलच्या संपर्कात होती अशी माहिती त्यांना मिळाली होती. यानुसार गुरूवारी दुपारी चौकशीसाठी राहुलला बोलावले होते.त्यानंतर तो घरी आला आणि सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुन्हा घराबाहेर गेला. त्यानंतर काही तासाने त्याच्या मृतदेहाची माहिती घरच्यांना मिळाली. पोलिसांनी चौकशीदरम्यान दमदाटी केल्याच्या भीतीने राहुलने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटूंबीयांनी केला आहे. (प्रतिनिधी)
बेलापूरमधील तरुणाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Updated: February 20, 2016 02:10 IST