वैभव गायकर,पनवेलगावात पिण्यासाठी पाणी नाही...मून आम्ही इतं या शहरात आलो...दोन वेळ पोट भरलं तरी खूप हाय... जागा मिळतं तेथं रात्र काढतो..रोजंदारी करून मिळतं ते काम करत आम्ही दिवस पुढे ढकलत हाव... ही व्यथा मांडली आहे बीड जिल्ह्यातील अष्टी तालुक्यात असलेल्या मैदा गावातून स्थलांतरित झालेल्या सचिन दहिफळे यांनी.राज्यभरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून सर्वात जास्त नुकसान शेतीचे झाले आहे. मराठवाडा, विदर्भात दुष्काळ असून हाताला काहीही काम मिळत नसल्याने अनेकांनी शहरांची वाट धरली आहे. रोजगार व कामधंद्यांच्या शोधात दुष्काळग्रस्त नवी मुंबई स्थलांतरित झाले असून मिळेत ते काम करताना दिसून येत आहेत. काही दुष्काळग्रस्त नवी मुंबईतील आपल्या नातेवाइकांकडे राहत आहेत तर काही जण रेल्वे स्थानक, बस डेपोमध्ये वास्तव्य करत आहेत.एकट्या बीड जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त गावातील रहिवासी नवी मुंबईत स्थलांतरित झाले आहेत. एकट्या नवी मुंबईत चार ते पाच हजार दुष्काळग्रस्त आले आहेत.गावात पाणी नसल्याने शेती तसेच सर्वच प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. कर्ज घेवून पिकवलेली शेती पाण्याअभावी वाळून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी ५ ते १० किमीची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळ आणि वाढत्या समस्या पाहता दुष्काळग्रस्तांनी थेट नवी मुंबईत स्थलांतर केले आहे. वाशी, नेरूळ, खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेलसारख्या शहरात रोजगाराच्या संधी शोधत आहेत. जवळपास ५० कुटुंबे याठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या अशी मागणी ते करीत आहेत. सध्या रसवंतीच्या गाड्या चालवून काही जण आपला उदरनिर्वाह करीत आहेत, तर काही जण रोजंदारीची मजुरी काम करून पोटाची खळगी भरत आहेत. महिलांनी देखील यामध्ये पुढाकार घेतला असून पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून त्या मेहनत करताना दिसत आहेत. जालना जिल्ह्यातून रांजणी या गावात शेतमजुरी करणारे विठ्ठल पाटोळे हे देखील मागील तीन महिन्यांपासून जुई कामोठे याठिकाणी राहत आहेत. दुष्काळामुळे रोजंदारी नसल्याने या ठिकाणी आल्याचे त्यांनी सांगितलं. सोबत दोन मुली, पत्नी असे त्यांचे कुटुंब आहे. जुई गावात भाड्याच्या खोलीत राहून सध्या उसाची रसवंती चालवत आहेत. लाकडी चरख्याद्वारे उसाचा रस काढून दिवसाला ३०० ते ४०० रुपये रोजगार मिळवत आहेत. दुष्काळाचे सावट दूर झाले की आम्ही याठिकाणाहून पुन्हा आमच्या गावी जावू, मात्र गावची परिस्थिती हलाखीची असल्याने आम्ही नाईलाजास्तव याठिकाणी राहत आहोत, असेही ते म्हणाले.
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त नवी मुंबईच्या आश्रयाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 03:13 IST