नवी मुंबई: विविध प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या वतीने आरटीओ कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला. रिक्षा चालकांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने पूर्तता न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.परिवहन विभागाच्या निर्देशानुसार आॅनलाइन लॉटरी पध्दतीने रिक्षा परवान्यांचे इरादापत्रांचे वाटप करण्यात आले. परंतु त्यातील तब्बल १0९ रिक्षा चालकांच्या प्रत्यक्ष परवाने न देता उलट त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी तातडीने सकारात्मक निर्णय घेवून या रिक्षा चालकांना परवाने वितरित करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे ओला, उबर रिक्षाला परवानगी देवू नये, प्रतीक्षा यादीतील रिक्षा चालकांना रिक्षा परवाने द्यावेत, तसेच रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित विभागाची सीआयडीच्या माध्यमातून चौकशी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. रिक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कासम मुलाणी आणि सरचिटणीस प्रसन्ना कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आरटीओ अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)
रिक्षा महासंघाची आरटीओवर धडक
By admin | Updated: October 14, 2016 06:51 IST