नवी मुंबई : जुईनगरमधील रेल्वे कॉलनीला भूतबंगल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील सांडपाणी साठविण्याच्या टाकीत बुधवारी म्हैस पडली. जानेवारीमध्ये टाकीत पडल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. वारंवार अपघात होवूनही रेल्वे प्रशासन काहीच कार्यवाही करत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जुईगरमध्ये भव्य निवासी संकुल उभारण्यात आले आहे. पण येथील जवळपास ३५ इमारती धोकादायक झाल्या आहेत. यामधील काहींचे बांधकामही पूर्ण झालेले नाही. उरलेल्या इमारतीही जर्जर झाल्या असून कधीही कोसळू शकतात. वसाहतीमधील सांडपाण्याची वाहिनी महापालिकेच्या मलनि:सारण वाहिनीला जोडण्यात आली नाही. सांडपाणी वसाहतीमध्येच भूमिगत टाकीमध्ये साठविले जात आहे. या टाकीवरील स्लॅब जर्जर झाल्याने जानेवारीमध्ये एक महिला टाकीमध्ये पडून गंभीर जखमी झाली होती. यानंतर रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला. स्थानिक नगरसेविका रूपाली भगत व युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत यांनी खासदार राजन विचारे यांच्यासोबत रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले पण सहा महिन्यांत एकही प्रश्न मार्गी लावलेला नाही. बुधवारी सकाळी रेल्वे कॉलनीमधील सांडपाणी साठविण्याच्या टाकीमध्ये म्हैस पडली. चार तासांच्या प्रयत्नानंतर म्हैस बाहेर काढण्यात यश आले. या खड्ड्यात पडून लहान मुले व नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता असल्याचे वारंवार सांगूनही प्रशासनाने कधीच दखल घेतली नव्हती. नागरिकांमधील असंतोष वाढल्याने बुधवारी तत्काळ टाकी बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. प्रशासनाने नवीन मलनि:सारण वाहिन्या टाकाव्या अशी मागणी केली असून पुन्हा दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
रेल्वे कॉलनी बनली धोकादायक
By admin | Updated: October 13, 2016 04:13 IST