नवी मुंबई : देशातील संस्कृती टिकवायची असल्यास, नव्या पिढीवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. भावी पिढी निर्व्यसनी व राष्ट्रभक्त घडली तरच देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. ऐरोली सेक्टर १० येथील डी.ए.व्ही. दिवा कोळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्संग सोहळ्यात त्यांनी भाविकांना मौलिक मार्गदर्शन केले. दिवसातील १४ तास घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांना आध्यात्मिक ऊर्जा देण्याचे काम स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गातून केले जात आहे. आदर्श पिढी घडविण्याचे काम स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून घडत आहे. श्री समर्थ सेवा मार्गाची संपूर्ण भारतात १५ हजारांहून अधिक सेवा केंद्रे असल्याने त्यांनी यावेळी सांगितले. सोहळ्यात प्रश्नोत्तरे, श्री दुर्गा सप्तशती पाठ, बालसंस्कार, वास्तुशास्त्र, विवाह संस्कार, मराठी संस्कृती अस्मिता व हस्तशास्त्र या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. महासत्संग सोहळ्यानिमित्त खारीगाव, विटावा, कळवा, पनवेल तसेच संपूर्ण नवी मुंबई परिसरात स्वामी समर्थ रथाची भ्रमंती करण्यात आली. रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी चैत्र पाडव्यापासून ते होळीपर्यंत सर्व सणांची मांडणी करण्यात आली होती. यामध्ये भारतीय संस्कृतीनुसार सण कसे साजरे करावे, याचीही सखोल माहिती देण्यात आली. विश्वकल्याण उन्नतीसाठी स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून देशभरात विविध उपक्र म राबविले जात आहेत. माजी मंत्री गणेश नाईक, खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादीचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक राजेश मढवी, नगरसेवक ममित चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
भावी पिढी निर्व्यसनी, राष्ट्रभक्त घडली तरच देशाची प्रगती
By admin | Updated: March 14, 2016 01:56 IST