पोलादपूर : पंचायत समितीची आमसभा गुरु वारी कॅप्टन विक्र मराव मोरे सभागृहात घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी विविध खात्यांवरील रोष व्यक्त केला. महावितरणकडून होणारा खंडित वीज पुरवठा, वाढीव रकमेची व उशिरा येणारी देयके, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, ग्राहकांना मिळणारी वागणूक, धोकादायक पोल बदलले नसल्याने दुर्घटनेची शक्यता व्यक्त करत कामात सुधारणा करण्याची मागणी केली.पंचायत समिती आयोजित आमसभेमध्ये पंचायत समिती व अन्य सरकारी कार्यालयाच्या विकास कामाचा आढावा घेण्यात येतो. आमसभा ही वर्षातून एकदाच घेण्यात येत असते या सभेमध्ये नागरिकांना आपले प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्याचा व त्याचे उत्तर मिळवण्याचे आणि प्रश्न सोडवण्याची संधी या सभेच्या माध्यमातून मिळते म्हणून नागरिक मोठ्या संख्येने येतात. या वर्षी तर तालुक्याची जीवनवाहिनी असेल्या एसटीच्या भोंगळ कारभारामुळे अनेक एसटी उशिरा सुटतात. काही वेळा अचानक रद्दही करण्यात येतात, परिणामी या मार्गावरील प्रवाशांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. नवीन प्रस्तावित फेऱ्या अद्याप सुरु करण्यात आल्या नाहीत, तसेच प्रवास करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे रस्त्यांची अद्यापही दुरवस्था असल्याची तक्र ारही केली, अनेक रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अशा रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते असे संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित के ले. पंचायत समीती, तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, तालुका कृषी कार्यालय, बीएसएनएल, भूमिअभिलेख, शिक्षण विभाग व अन्य विषयांवरही वादळी चर्चा झाली. सरकारी अधिकारी व कर्मचारी नागरिकांची कामे योग्य प्रकारे करत नाहीत, जाणीवपूर्वक विलंब करतात, परिणामी ग्रामस्थांचा वेळेचा अपव्यय होतोच सोबत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याच्या तक्र ारींचा पाऊस पडला. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली असली तरी पोलादपूरमध्ये विकासाचं पाणी अजूनही पोहोचलेलंच नाही.यावेळी गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, तहसीलदार के.डी.नाडेकर, जिल्हा परिषद सदस्य अपर्णा जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य दिलीप भागवत, पंचायत समिती सभापती अर्चना कुंभार,उपसभापती लक्ष्मण खेडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
समस्यांनी गाजली आमसभा
By admin | Updated: August 12, 2016 02:25 IST