वैभव गायकर, पनवेलमहापालिका निवडणुकीकरिता प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहेच. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या स्वतंत्र निवडणूक लढविण्यास सज्ज होऊ लागल्या आहेत. कळंबोलीत रोडपाली-कळंबोली विकास आघाडीची स्थापना झाली असून त्याचे सर्व राजकीय पक्षासमोर मोठे आव्हान आहे. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये ग्राम विकास आघाडीचा उदय होण्याचे चिन्ह आहे. याशिवाय खारघर फोरम सुध्दा डोकेवर काढू लागली आहे.भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना या तीन प्रमुख पक्षांच्या नियमित बैठका सुरू आहेत. त्याचबरोबर महापौरपदासाठीही जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून सामाजिक उपक्र माचा धडाका लावण्यात आला आहे. नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी शहरात होर्डिंग्ज व बॅनरबाजीवर जोर दिला आहे. भाजपाच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तर शेकापकडून माजी आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेतल्या जात आहेत. शिवसेनेकडून सुध्दा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसकडून ‘एकला चलो रे’चा सूर निघाला आहे. राष्ट्रवादीने शेकापला आपल्या सोबत घेतले आहे. कळंबोलीत अशी अनोखी आघाडी स्थानिक नेते आत्माराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते पाटील गेल्या काही वर्षांपासून घड्याळापासून दूर असून त्यांनी आपले काम स्वतंत्ररीत्या सुरू ठेवले आहे. पनवेल महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. कळंबोली जिल्हा परिषदेत गटात गत निवडणुकीचा अपवाद वगळता, त्यांनी पाच वेळा आपल्या समर्थकाला निवडून आणले होते. त्यांचे बंधू महादेव पाटील त्याचबरोबर पत्नी अनिता पाटील हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. खारघरमध्ये कॉलनी फोरम सक्रिय!खारघरमध्ये मागील ग्रामपंचायत निवडणुकीत खारघर कॉलनी फोरम स्थापन करण्यात आली होती. वसाहतीमधील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य खारघर ग्रामपंचायतीमध्ये बसावेत हा या मागचा उद्देश होता. सर्वपक्षीय विरु द्ध फोरम असे चित्र खारघरमध्ये निर्माण झाले होते. आपली छाप पाडणाऱ्या फोरमला यावेळी यश मिळाले नव्हते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भाजपा प्रवेशानंतर खारघर कॉलनी फोरमचे सदस्य भाजपात सहभागी झाले होते. मात्र खारघरमधील पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा एकदा फोरमला सक्रिय करण्यास कारणीभूत ठरत असून फोरममधील मंडळी पुन्हा एक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वच पक्षांतून सर्वांनाच तिकीट देणे अशक्य आहे. त्यामुळे नाराज सुध्दा फोरमची वाट धरू शकतात.कळंबोलीत विकास आघाडी महत्त्वाचीरोडपाली-कळंबोली विकास आघाडीची स्थापना करणारे आत्माराम पाटील यांनी कळंबोली वसाहत समुद्रसपाटीपासून साडेतीन मीटर खाली असल्याचे पाणी साचत असल्याचे उघड केले. सिडको कोट्यवधीं खर्च करून पावसाचे पाणी जाण्याकरिता नियोजन केले. त्याचबरोबर मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न आत्माराम पाटील यांनी तडीस नेला, त्याकरिता पंधरा वर्षे पाठपुरावा केला. पेट्रोलपंपापासून रस्ते, पाण्याच्या सुविधेकरिता सिडकोविरोधात आंदोलन केले.रोडपालीत डासांच्या निर्मिती करणाऱ्या भूखंडावर साडेसातशे डम्पर माती स्वखर्चाने टाकली. विकास आघाडीच्या या जमेचा बाजू असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली आहे.
निवडणुकीत ‘आघाड्यां’ची चलती
By admin | Updated: October 24, 2016 03:01 IST