नवी मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे ५ सप्टेंबरला आगमन होत आहे. त्यासाठी सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरातील सर्वच शाळांना पाच दिवसांची सुटी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे भेट घेऊन निवेदन सादर केले. सर्वत्र थाटामाटात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी शहरातील चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात व आपल्या गावी जातात.उत्सवाच्या काळात नवी मुंबईतील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा जाणूनबुजून परीक्षांचे आयोजन करीत असल्याची नाराजी मनविसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. येत्या ३-४ दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी शहर सचिव निखील गावडे, उपशहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, संदेश डोंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवात शहरातील शाळांना पाच दिवस सुटी
By admin | Updated: August 31, 2016 03:41 IST