नवी मुंबई : सीबीडी परिसरातील सेक्टर तीन व चार परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे. सकाळी, दुपारी तसेच संध्याकाळी अशा तीनही वेळांमध्ये या परिसरातून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना चांगलीच कसरत करावी लागते. या परिसरात दोन ते तीन शाळा तसेच महाविद्यालये असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. पाल्याच्या शिक्षणाबाबत जागरूक पालकांनी चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे याकरिता शाळा ते घर या अंतराकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. अशा वेळेस लांबच्या अंतरावरील विद्यार्थ्यांच्या हातात सायकल तसेच दुचाकी दिली जाते. यामुळे शाळेतील अपुऱ्या पार्किंगच्या सुविधेमुळे पेच निर्माण होतो. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर, फुटपाथवर तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जात आहे. शाळा भरताना तसेच सुटताना याठिकाणी असलेल्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. अगदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडेही दुचाकी वाहने दिसून येतात.विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी असलेल्या स्कूल बस, व्हॅन, रिक्षा आणि खाजगी वाहनांनी प्रवास करण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरातून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकाला कसोटी पणाला लावावी लागते. सीबीडी सेक्टर तीन व चार परिसरात ज्ञानपुष्प विद्यानिकेतन, डी. वाय. पाटील बिझनेस स्कूल, भारती विद्यापीठ मॅनेजमेंट कॉलेज तसेच दंत महाविद्यालय, भारती विद्यापीठ प्र.शाला व ज्यु. कॉलेज, खाजगी प्ले स्कूल व नर्सरी आहे. या शाळा, महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. शाळेभोवतालच्या फुटपाथचा वापरही वाहने उभी करण्यासाठी केला जात असल्याने पादचाऱ्यांनाही येथून मार्ग काढणे अवघड झाले आहे. (प्रतिनिधी)
वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण
By admin | Updated: August 30, 2016 03:20 IST