ठाणे : शहरात रविवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी वाहतुकीत बदल केला आहे. या दिवशी सायंकाळपर्यंत ठाणे स्थानकवरील सॅटीस पुलावरून एकही बस सुटणार नाही. याऐवजी त्या बस ठाणे पूर्व कोपरी स्थानक येथून सुटून आनंदनगर व पुढे तीनहातनाका उड्डाणपुलावरून पुढे जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.तीनहातनाका येथून निघणारा मोर्चा मल्हार सिनेमा-गोखले रोड-मूस चौक-टॉवरनाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाणे शहर वाहतूक शाखेने वरील मार्ग सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. याचदरम्यान, नवी मुंबईकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या बसना शिवाजी चौक, कळवा क्रीकनाक्याकडे प्रवेश बंद केला आहे. त्या शिवाजी चौकाला वळसा घालून पुन्हा नवी मुंबईच्या दिशेने परत जाणार आहेत. तर, बोरिवलीकडून येणाऱ्या बसेसना घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान सिग्नलपासून पुढे कापूरबावडी सर्कलच्या दिशेने तसेच मॉडेल चेकनाका येथून येणाऱ्या बसना रहेजा कॉम्प्लेक्स सिग्नलपासून पुढे तीनहातनाक्याच्या दिशेने प्रवेश बंदी करण्यात येत आहे. वंदना बस स्थानक आणि खोपट मध्यवर्ती बस स्थानक येथील सर्व बसगाड्या खोपट सिग्नल ते कॅडबरी जंक्शनमार्गे पुढे जातील. नाशिक-घोडबंदरकडून येऊन तीनहातनाक्यावरून उजवे वळण घेऊन मॉडेल चेकनाकामार्गे तर मुलुंडकडे जाणारी वाहने तीनहातनाका पुलावरून आनंदनगरकडे जाऊन यू टर्न घेऊन नाक्यावरून डावे वळण घेऊन मुलुंडकडे जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी दिली. (प्रतिनिधी)
मराठा क्रांती मोर्चासाठी उद्या ठाण्यातील वाहतुकीत बदल
By admin | Updated: October 15, 2016 06:37 IST