म्हसळा : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टमधून मोठ्या प्रमाणावर नागरी वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यावरून अवजड व ओव्हरलोड वाहतुकीमुळे दिघी ते माणगाव रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, मात्र दिघी पोर्ट प्रशासनाने याकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. यामुळे भाजपच्या वतीने छेडण्यात आलेले आंदोलन शासनाविरोधात नसून मुजोर दिघी पोर्ट प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी सत्तेत असतानाही दिघी पोर्ट चांगले रस्ते करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे भाजपा जिल्हा अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी म्हसळा येथे चक्का जाम आंदोलनाच्या वेळी सांगितले. यावेळी आंदोलनकर्ते जिल्हा अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर,भाजपा नेते कृष्णा कोबनाक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन ३४१ प्रमाणे नोटीस बजावून सुटका केली. या आंदोलनामध्ये श्रीवर्धन क्षेत्र प्रमुख कृष्णा कोबनाक, उपजिल्हा अध्यक्षा सरोज म्हशीलकर, माजी जिल्हा अध्यक्ष संजय कोणकर ,तालुका प्रमुख शैलेश पटेल,श्रीवर्धन तालुका प्रमुख मनोज पटेल, आरपीआय तालुका अध्यक्ष राजेश तांबे, प्रकाश रायकर आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ. प्रशांत ठाकूर म्हणाले की, सत्तेत असताना तुम्ही कसले आंदोलन करीत आहात असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याला उत्तर देताना म्हणाले की, सत्तेत असलो तरी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आज चक्का जाम आंदोलन केले जात आहे. आज सर्वसामान्य नागरिकांना आमच्या आंदोलनामुळे त्रास सहन करावा लागत असला तरी आजच्या आंदोलनामुळेच दिघी पोर्ट आपल्याला चांगले रस्ते देणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिघी पोर्ट प्रशासनाने रस्ते चांगले केले नाही तर कंपनीच्या गेटसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा नेते कृष्णा कोबनाक यांनी दिला. (वार्ताहर)
म्हसळ्यात भाजपाचे चक्का जाम
By admin | Updated: February 19, 2016 02:30 IST