रघुनाथ पांडे - नवी दिल्लीभाजपच्या प्रचाराच्या ताज्या जाहिरातीत ‘उपद्रवी गोत्र’ असा उल्लेख केजरीवालांचा झाल्याने त्याचा कमालीचा राजकीय लाभ केजरीवाल यांनी घेतला, आणि दिवसभर आप चर्चेत राहिला. पुढचे चार दिवस हा जोर शिगेला पोहोचलेला असेल.पाच राज्यांचे मुख्यमंत्री, विविध राज्यांतील मंत्री, भाजप सरकारे असलेल्या राज्यांतील पदाधिकारी, पक्षाच्या आघाड्यांचे पदाधिकारी, १२० खासदार, तीनशेवर आमदार, उत्तरप्रदेश- बिहारमधून आलेला भाजपचा मोठा ताफा, सर्वच केंद्रीय मंत्री, भाजपची केंद्रीय कार्यकारिणी, विहिंपपासून धर्मजागरणपर्यंतचे कार्यकर्ते आणि या सोबतच रा.स्व.संघाचे स्वयंसेवक. अशी तगडी फौज भाजपच्या दिमतीला असतानाही ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या तोंडचे पाणी पळविले आहे.!! पराभवाची अंधुकशीही जोखिम भाजप घ्यायला तयार नाही. भाजपचे लक्ष्य ‘आप’ आहे आणि केजरीवाल यांनाच डोळ््यासमोर ठेवून प्रचाराचा धडाकाही सुरू आहे. भाजपच्यादृष्टीने काँग्रेस रिंगणातच नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून नुक्कडसभा घेणाऱ्या खासदारांपर्यंत साऱ्यांचा हल्ला केजरीवाल यांच्यावरच आहे. भाजपच्या जाहिरातींमध्ये आप व केजरीवाल यांनाच लक्ष्य केले आहे. निवडणूक एकट्या दिल्ली राज्याची असला असली, तरी तिला राष्ट्रीय स्वरूप देऊन भाजपने आपले केंद्रीय मंत्री निवडणूक प्रचारात उतरवून त्यांना ‘आप’ला पाच प्रश्न विचारून जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण केजरीवाल त्यांना बधत नाहीत. लोकसभा निवडणुकीत मोदींवर विरोधकांनी मौत का सौदागरपासून अनेक जी दुषणे लावली होती, त्यातून मोदींनी सहानुभूती मिळवत सत्तेचा सोपान गाठला. तेच केजरीवालांबाबत घडत आहे. भाजपतून त्यांच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक दगडाचा त्यांनी सत्तेकडे नेणारी पायरी म्हणून उपयोग सुरू केला आहे. सट्टा बाजार, इंटेलिजन्सचे रिपोर्टस व जनमत चाचण्यांचे कल भाजप व आपला तोडीस तोड आहेत. भ्रष्टाचाराच्या लढाईतून सत्तेत शिरण्याचे ध्येय बाळगून केजरीवाल यांनी, दोन वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर २०१२ रोजी आपची स्थापना केली. वर्षभरानंतरच्या दिल्ली निवडणुकीत ७० पैकी ६९ जागांवर लढून २८ जागा जिंकत दिल्लीचे तख्त काबिज करून वीज, पाणी, सुरक्षेबाबतचे बिनतोड निर्णय घेऊन ४९ दिवसांत केजरीवाल यांनी सत्ता सोडली. पण, त्यानंतरचे ११ महिने केजरीवाल यांनी बांधणी केली. लोकसभेत चार खासदार मिळवले आणि पूर्वीच्या चुका दुरूस्त करत दिल्ली पुन्हा ताब्यात घेण्यासाठी तयारी केली. मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव व आशुतोष हे त्यांचे बिनीचे साथीदार. दिल्लीचा मध्यवर्ती इलाका सोडला तर इतर भागात राजधानीचे नावनिशाण दिसत नाही. वीज, पाणी, सुरक्षा, वाहतूक, रोजगार, शाळांमध्ये शुल्कात होणारी लूट हे सारे विषय रोज दिल्लीकरांना भेडसावतात. सकाळी सात ते पहाटे दोन अशी केजरीवाल यांची सध्याची कार्यशैली आहे. वर्तमानपत्रातील बातम्या व टिव्हीवरील ताज्या घडामोडींचे ब्रीफिंग ते आशुतोष व योगेंद्र यादव यांच्याकडून घेतात. भाजपवर कसा हल्ला करायचा याची रणनिती रोज ठरते, आणि सकाळी आठची पहिली प्रचारफेरी सुरू होते. प्रचारसभा, घरबैठकी, दुकानाच्या समोर बसून जमलेल्यांशी गप्पा, तिथेच कुठेतरी खाणपान. दिवस कितीही व्यस्त असला तरी तीन सभा युवकांसोबत व तेवढ्याच महिलांसोबत असतात. मागील आठ दिवसांत १४० सभा, टिव्हीवर १४ मुलाखती आणि ४०० घरसभा पार पडल्या. ७० विधानसभांचा दोनवेळा दौरा झाला आहे. केजरीवालांनी उमेदवार देताना मोदीस्टाईल वापरून जनतेचे लक्ष्य आपल्यावर केंद्रीत करून मते मिळतील असे समीकरण आहे. प्रचाराची सोपी पद्धत वापरली आहे, मै हूँ केजरावील. अशा टोप्या घातलेली व हाती दानपेटी असलेली पोरंटोरं गळ््यात आपचे ओळखपत्र अडकवून गर्दीच्या ठिकाणी, वाहतूक तळावर, बगिच्यात, मोटारी व मेट्रोत आपल्याला दिसतात. ते बोलत काहीच नाहीत, पण लक्ष वेधून घेतात. काळे-पांढरे दोन मफलर, टोपी, स्वेटर व हलकासा खोकला ही स्टाईल टिकेचे लक्ष ठरली तरी दिल्लीकरांना भावली.४० पेक्षाअधिक जागा मिळवू असा दावा योगेंद्र यादव यांचा आहे, तर केजरीवाल पाच साल केजरीवाल..असा नारा देत आहेत.
दिल्लीत आपची चिवट झुंज!
By admin | Updated: February 3, 2015 02:17 IST