नवी दिल्ली : अल्पसंख्याकांविरुद्धची विधाने खपवून घेणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ परिवाराला दिला आहे. आमचे सरकार कोणत्याही समुदायाविरुद्ध भेदभाव किंवा हिंसाचाराला मुळीच थारा देणार नाही. प्रत्येक नागरिकाला देशाच्या घटनेने धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत दिली आहे.भाजपच्याच काही नेत्यांनी केलेली सांप्रदायिक विधाने दुर्दैवी होती. कोणत्याही समुदायाबद्दल भेदभाव किंवा हिंसाचाराला थारा दिला जाणार नाही, हे मी यापूर्वीच म्हटले आहे. आज पुन्हा म्हणत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हाच माझ्या सरकारचा मंत्र असून आम्ही त्याच मार्गावर चालत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.देशाचा वाईट काळ संपला असून आता ‘अच्छे दिन’ आले असताना काही लोक सरकारची कामगिरी निष्प्रभ करण्याच्या कामाला लागले आहेत. आमचे सरकार येण्यापूर्वी देश वाईट काळातून जात होता. दररोज एक नवा घोटाळा समोर येत होता. देश सुन्न आणि हताश झाला होता. ते वाईट दिवस, वाईट कर्म आणि वाईट कारनामे आठवले तर आपल्याला वाटेल की, देशाला वाईट दिवसांपासून मुक्ती मिळाली आहे. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कामगिरीबाबत समाधान असल्याचे सांगतानाच त्यांनी आम्ही आश्वासनांच्या कसोटीवर खरे उतरलो असल्याचे स्पष्ट केले. विदेश दौऱ्यांबाबत विरोधकांनी टीकेची झोड उठविल्याकडे लक्ष वेधण्यात आले असता मोदी म्हणाले की, आपल्या घोटाळ्यांची विदेशात माहिती नव्हती असे काँग्रेसला वाटते काय? या पक्षाला घोटाळ्यांची लाज वाटायला हवी, त्याच्या वर्णनांची नव्हे. देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)