नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कोण असणार हा आता तर्कवितर्कांचा मुद्दा बनला आहे. त्यांचे खास विश्वासू अमित शाह सरकारमध्ये लगेच सहभागी होण्याची शक्यता नाही. भाजपाध्यक्ष राजनाथसिंह हे गृह किंवा संरक्षण खाते मिळवण्यात उत्सुक असून त्यावरच शाह यांचा सहभाग निर्भर असेल, असे मानले जात आहे. मोदींच्या कामाची पद्धत पाहता राजनाथसिंह यांनी आणखी काही काळ पक्षात ठेवण्यावर त्यांचा भर असेल. याच वर्षी सहा राज्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत तरी राजनाथसिंह यांच्याकडे पक्षाध्यक्षपद कायम ठेवावे, असे मोदींना वाटते. मोदी सरकारमध्ये सामील होण्यावर अडून बसणार असतील तर अमित शाह यांच्याकडे पक्षाध्यक्षपद दिले जाऊ शकते. अमित शाह यांना पक्षाध्यक्षपद देण्याला रा. स्व. संघाचा असलेला आक्षेप पाहता राजनाथ यांना या पदावर कायम ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. तसे झाल्यास मोदींना गृहखाते स्वत:कडे ठेवणे आणि नायब राज्यपालांमार्फत दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था पाहणे शक्य होईल. सध्या दिल्लीची विधानसभा निलंबित आहे. पहिल्या टप्प्यात दोन डझन मंत्री शपथ घेतील, असे संकेत मिळाले. अरुण जेटली गेल्या ३० वर्षांपासून मोदींसोबत असून त्यांनी मोदींची न्यायालयातील सर्व प्रकरणे वकिलांच्या फौजफाट्यासह सांभाळली आहेत. मोदींशी असलेले संबंध पाहता जेटलींचा अमृतसर येथे झालेला पराभवही अडचणीचा ठरणार नाही. पराभूत होऊनही जेटलींची किंमत कमी झालेली नाही. त्यांच्याकडे अर्थ, विदेश असे महत्त्वाचे खाते दिले जाऊ शकते. खरे तर विदेश मंत्रालयासाठी योग्य व्यक्ती कोण याबाबत मोदी जेटलींचाच सल्ला घेऊ शकतात. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाकडे अर्थखाते दिल्यास जेटलींना विदेश मंत्रालयाचा पर्याय उपलब्ध असेल. अरुण शौरींनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नितीन गडकरी कामकाज सुरळीत आणि सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी मोदींची गडकरींवर भिस्त असेल. गडकरी यांनी विकासदृष्टी ठेवून केलेले काम पाहता त्यांना वाहतूक, नगरविकास किंवा ग्रामीण विकासासारखे खाते दिले जाऊ शकते. सुषमा स्वराज सुषमा स्वराज सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या आणि वरिष्ठ नेत्या असून मंत्रिमंडळात पहिल्या चारमध्ये स्थान मिळण्याचा दावा करू शकतात. तसे स्थान न मिळाल्यास त्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार देतील. सुमित्रा महाजन लोकसभेत सातवेळा खासदार राहिलेल्या सुमित्रा महाजन यांच्याकडे लोकसभाध्यक्षपद दिले जाऊ शकते. त्या पक्षाच्या निष्ठावान खासदार असून मीराकुमार यांच्या जागी महिलेकडे पुन्हा पद देण्याचा उद्देशही साध्य होऊ शकतो. हर्षवर्धन - दिल्ली, राव इंद्रजित- हरियाणा, एम. व्यंकय्या नायडू- आंध्र प्रदेश, रविशंकर प्रसाद, सी.पी. ठाकूर - बिहार, शांताकुमार- हिमाचल प्रदेश, पीयूष गोयल- महाराष्ट्र, सौरभ पटेल- गुजरात आदींनाही स्थान मिळू शकते.
कोण असेल मोदींच्या मंत्रिमंडळात?
By admin | Updated: May 17, 2014 03:04 IST