नवी दिल्ली : भारतीय लष्कर आणि वायूदलाने एकत्र येत सीमा ओलांडून म्यानमारमध्ये बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराच्या इतिहासात ही केवळ अभूतपूर्व घटना नसून भारत आक्रमक प्रत्युत्तर देऊ शकतो, असा संदेशच भारताने दिला आहे. विशेषत: भारतातील सशस्त्र बंडखोरांना चीन मदत करत असल्याच्या गुप्त वार्तेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरते. चीन भारताच्या सर्व बाजूंनी गुंतवणूक करत म्यानमार, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान अशी मालिका तयार करत आहे, त्याचप्रमाणे सागरी व्यापारी मार्गाच्या नावाखाली भारताची कोंडी करण्याचीही त्याची योजना आहे. भारताच्या ताज्या साहसी आॅपरेशनमुळे चीनला आपल्या कारवायांचा वेग नक्कीच कमी करावा लागेल, अशी लक्षणे आहेत.गेली अनेक वर्षे ईशान्येकडील बंडखोर आणि अस्थिरतेच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या सात राज्यांमध्ये पायाभूत सुविधा वाढाव्यात, तेथील विद्यार्थ्यांना देशभरात शिक्षणासाठी जायला मिळावे तसेच मुख्य प्रवाहात आपण आहोत याची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न सुरूच असतात. तरीही फुटीरवाद्यांच्या हल्ल्यांमुळे व स्थानिक प्रश्नांमुळे त्यावर योग्य तोडगा निघू शकलेला नाही. ४ जून रोजी मणिपूरच्या चंडेल जिल्ह्यामध्ये हल्ला करून अतिरेक्यांनी १८ जवानांचे प्राण घेतल्यामुळे भारतीय सुरक्षा व्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला. भारतीय लष्कर लवकरच त्याला प्रत्युत्तर देईल आणि त्याची तयारी सुरू आहे अशा बातम्याही त्यानंतर येऊ लागल्या होत्या. दरम्यान, या संघटना ४ जूनच्या हल्ल्याप्रमाणे पुन्हा हल्ले करण्याच्या विचारात होत्या. मात्र त्यापूर्वीच त्यांचे कंबरडे मोडण्यात आले. या सर्व घडामोडी गुप्तरीत्या, जलदगतीने करण्यात आल्या, त्यामुळेच कारवाईनंतर भारतीयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अशी झाली म्यानमारमधील कारवाई
By admin | Updated: June 11, 2015 08:59 IST