नवी दिल्ली : इंधनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्धार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. सध्या कात्रा येथे रेल्वेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. हा प्रकल्प मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी पाच वर्षांमध्ये सौरऊर्जेच्या वापरामुळे १ हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती रेल्वे करणार असून, त्यासाठी खासगी उद्योगांचीही मदत घेतली जाणार आहे.आगामी पाच वर्षांच्या काळामध्ये रेल्वेच्या तसेच खासगी जागेमध्ये सौरऊर्जेसाठी उपकरणे बसविली जाणार आहेत. त्याचबरोबर रेल्वेच्या मालकीच्या इमारतींवर सौरऊर्जानिर्मितीची संयंत्रे बसविली जाणार आहेत. यासाठीचे अनुदान हे अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयातर्फे दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज असल्याचा दावा करीत प्रभू यांनी सांगितले की, रेल्वेकडून होत असलेला खनिज तेलाचा वापर हा अन्य वाहनांपेक्षा खूपच कमी आहे. रेल्वे जरी खनिज तेलाची मोठी खरेदीदार असली तरी रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे केवळ सात टक्के इंधनाचा वापर करते. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वेकडून होणारे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ८० टक्के यांनी कमी आहे. याचाच अर्थ देशाचा पर्यावरणीय समतोल राखण्यास रेल्वेने मोठा हातभार लावला आहे. अधिक गुंतवणुकीमुळे नवीन यंत्र आणि तंत्रांचा वापर करून अधिक लाभ मिळू शकेल, असेही प्रभू म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बचतीसाठी रेल्वेतर्फे सौरऊर्जेचा वापर
By admin | Updated: February 27, 2015 02:23 IST