नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कार्यकाळात भारतीय विशिष्ट ओळख क्रमांक (यूआयडीएआय) अर्थात आधार क्रमांकाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्रालयाने आता या मतावरून घूमजाव करीत, आधारला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे़ या योजनेच्या माध्यमातून केव्हाही, कुठेही, कुठल्याही प्रकारे लाभार्थ्याची सार्वभौम ओळख पटविण्यास मदत मिळेल, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे़गृहमंत्रालयाने या संदर्भात सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे़ आधार क्रमांक केवळ एका व्यक्तीस दिला जातो़ यामुळे ओळख पटविण्यास मदत मिळेल़ उपेक्षित आणि गरजू लोकांना बँकिंगसारख्या सेवांपर्यंत पोहोचण्यास आधारमुळे मदत होते़ भौगोलिक आणि बायोमेट्रिक माहितीवर आधारित असल्यामुळे आधारमुळे फसवणूक आणि तत्सम कारवाया संपुष्टात आणण्यास मदत मिळेल, असे या पत्रात म्हटले आहे़गृहमंत्रालयाची ही भूमिका आधीपेक्षा पूर्णत: विसंगत आहे़ तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पी़ चिदंबरम यांच्या कार्यकाळात, गृहमंत्रालयाने आधार ओळखपत्राच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘आधार’वरून घूमजाव; पूर्ण पाठिंब्याची घोषणा
By admin | Updated: October 27, 2014 01:47 IST